: जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने पंचगंगा नदीचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले. या नदीची पाणी पातळी ३२ फुटावर पोहोचली असून ३७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर शहराजवळच असणाऱ्या कळंबा तलावातील पाणी ओसंडून वाहत आहे. गुरुवारीदेखील मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासूनच पाऊस सुरू होता. रात्रीनंतर पावसाचा जोर वाढला. रात्रभर रिपरिप सुरू होती. बुधवार व गुरुवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळपासून अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. तसंच धरणक्षेत्रात तर पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला. याशिवाय राधानगरी, शाहूवाडी, आजरा, चंदगड या तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली.

वाहतूक बंद झाली!
मुसळधार पावसाने कोल्हापूर ते रत्नागिरी रस्त्यावर प्रयाग चिखली फाट्याजवळ झाड पडल्याने दोन तास वाहतूक बंद होती. दरड कोसळल्याने करूळ घाटातील वाहतूक बंद असतानाच भुईबावडा घाटातही दरड कोसळली. यामुळेही वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कोल्हापूर शेजारी असणारा कळंबा तलाव पूर्णपणे भरला आहे. तलावातील पाणी २७ फुटापर्यंत वाढल्यानंतर सांडव्यातून बाहेर पडणारे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या या जोरदार पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ३२ फुटावर पोहोचली आहे. जिल्ह्यातील ३७ बंधारे पाण्याखाली गेली आहेत. गुरुवारीदेखील अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here