कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्याने रौद्ररूप धारण केले असून प्रशासनाने धबधब्याच्या जवळ जाण्यास मनाई केली आहे. दरम्यान, राज्यात रत्नागिरी, महाड, चिपळूण, कोल्हापूर, नाकिश, सांगली, सातारा या जिल्यांना मुसळधार पावसामुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराला (Chiplun Flood) पुरानं वेढा दिला असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे. चिपळूण खेर्डी येथे २० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.
एनडीआरएफची (NDRF) चार पथके रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचली असून त्यातील दोन पथकांनी चिपळूणमध्ये मदत व बचावकार्य सुरू केलं आहे. दापोली तालुक्यातील हर्णे व दाभोळ येथूनही होडी आणि बोटी घेऊन पट्टीचे पोहणारे पथक चिपळूण येथे दाखल झाले आहे. मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
रत्नागिरीतील जाणीव फाऊंडेशनची टीम सुद्धा चिपळूणला पोहोचली आहे. रत्नागिरीतून ‘हेल्पिंग हँड’चे कार्यकर्तेही पोहोचले आहेत. मालवण येथील आपत्कालीन ग्रुपचे २२ जणांचे पथक तीन इंजिन बोटींसह मुंबई-गोवा मार्गे लवकरच दाखल होत आहे. अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी वायरलेसद्वारे दिलेल्या माहितीनुसार, सध्या चिपळूणमध्ये १५ बोटी उपलब्ध असून त्यापैकी ८ बोटींमार्फत बचावकार्य सुरू आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times