म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात हाहाकार माजला असून महापुराचा विळखा क्षणाक्षणाला घट्ट होत आहे. पंचगंगा, वारणा, कृष्णा यासह सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक गावात, घरात पाणी घुसले आहे. यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्यात येत आहे. पाणी वाढल्याने पुणे- बेंगळुरू महामार्गासह जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाल्याने शंभरावर गावांचा संपर्क तुटला आहे. सकाळी पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या ३६ जणांना सुखरूप वाचविण्यात आले. एनडीआरएफच्या जवानांची दोन पथके कार्यरत असून लष्कराच्या तुकडीलाही पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारीदेखील रेडअलर्ट जाहीर केल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

दोन दिवस जिल्ह्यात प्रचंड पाऊस पडत आहे. यामुळे सर्व नद्या, ओढे, नाले दुधडी भरून वाहत आहेत. यामुळे ११७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अनेक रस्ते बंद झाले आहेत. पंचगंगा नदीने गुरूवारी मध्यरात्रीच धोकापातळी ओलांडली. ती शुक्रवारी सायंकाळनंतर तब्बल ५५ फुटावरून वाहू लागल्याने धोका वाढला आहे. धोका पातळी ४३ फुट असताना नदीने रौद्ररूप धारण केले आहे. राधानगरी धरणाचे दरवाजे उघडताच त्याला आणखी रौद्ररूप येणार आहे. प्रचंड पावसाने अनेक गावात, शहरात पाणी घुसले आहे. कोल्हापूर शहरात २०१९ पेक्षा अधिक स्थिती गंभीर झाली आहे. नागाळा पार्क, रमणमळा, कदमवाडी यासह अनेक भागात पाणी घुसले आहे. निम्मे शहर पाण्याच्या विळख्यात आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
दुधगंगा नदीचे पाणी पुणे- बंगळुरू राष्टीय महामार्गावर आले आहे. यामुळे सकाळपासून महामार्ग बंद पडल्याने शेकडो वाहने रस्त्यावर अडकून पडली आहेत. याशिवाय आंबा, आंबोली घाटात दरड कोसळल्याने कोकणाशी वाहतूक संपर्क तुटला आहे. आंबोलीतील दरड काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. कोल्हापूर -रत्नागिरी, कोल्हापूर- गगनबावडा, कोल्हापूर- सांगली बायपास यासह जिल्ह्यातील अनेक रस्ते बंद झाले आहेत. पन्हाळा येथे रस्ता खचला असल्याने गडावरचा संपर्क थांबला आहे.

क्लिक करा आणि वाचा-
राधानगरीसह काही तालुक्यात आजही विक्रमी पावसाची नोंद झाली. काही भागात ५०० मिमिपेक्षा अधिक पाऊस झाला. अनेक गावांना पुराने वेढले आहे. चिखली, आंबेवाडी यासह करवीर, राधानगरी, शिरोळ तालुक्यातील बहुतांशी गावांचा समावेश आहे. रत्नागिरीला निघालेली कर्नाटकची एस.टी. बस रजपूतवाडीजवळ पाण्यात अडकली. त्यातील २५ प्रवाशांना एनडीआरएफच्या जवानांनी वाचविले. गारगोटीजवळही नाशिककडे जात असलेल्या अकरा प्रवाशांना वाचविण्यात आले. जिल्ह्यात दोन ठिकाणी झालेल्या भूस्खननात दोन घरे गाढली गेली. यामध्ये जिवितहानी झाली नसली तरी काही जनावरे दगावली.

आजच्या महापुराने २०१९ च्या आठवणी ताज्या झाल्या. दोन वर्षापूर्वी आलेल्या महापुरावेळी पंचगंगेचे पाणी ५५.६ फुटावरून् वाहत होते. यंदा त्यापेक्षा जादा पाणी पातळी वाढणार आहे. शुक्रवारी रात्रीच पाणी पातळी ५५ फुटावर गेली. कोयनेतून वाढलेल्या विसर्गामुळे पंचगंगेचे पाणी काही प्रमाणात संथ होणार असल्याने आणि राधानगरीचे दरवाजे उघडणार असल्याने परिस्थिती गंभीर होणार आहे. त्यामुळे लोकांनी सतर्क रहावे असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

मदतकार्याला वेग

जिल्ह्यात प्रशासनाबरोबरच एनडीआरएफची दोन पथके मदतीला कार्यरत आहेत. परिस्थिती गंभीर होत असल्याने लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. स्थानिक युवक मदतकार्यात सक्रीय आहेत. स्थलांतरित लोकांना मदत करण्यासाठी काही ठिकाणी माणुसकीचा महापूर वाहत आहे.

कोल्हापुरातील स्थिती:

> मुंबईला होणारा गोकुळचा दूधपुरवठा बंद
> कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठा बंद
> अलमट्टीतून दोन लाख क्यूसेस पाण्याचा विसर्ग
> शनिवारीही रेडअलर्ट, परिस्थिती होणार गंभीर
> जनजीवन विस्कळित, धोका वाढला
> कोकणात जाणारे अनेक मार्ग बंद
> राधानगरीचे दरवाजे उद्या उघडणार

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here