मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील आंदर मावळ खोऱ्यात कल्हाट येथील तासुबाई मंदिरावर शुक्रवारी रात्री दरड कोसळल्याने मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंदिराचा बहुतांश भाग हा दरडीखाली गेला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. यापूर्वी मंदिराजवळ ६ जून रोजी येथील डोंगराचा कडा कोसळून मोठी दरड कोसळली होती. त्यावेळी शेतीचे मोठे नुकसान झाले होते. लागोपाठच्या या दोन घटनांमुळं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून शासनाने गावचे पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आंदर मावळ खोऱ्यात असलेल्या कल्हाट येथील उंच डोंगराच्या पायथ्याशी टेकडावर ग्रामदेवता तासुबाई देवीचे मंदिर आहे. शुक्रवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे मंदिरावर मोठी दरड कोसळली. त्यात मंदिराचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यावेळी मंदिरात कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. शनिवारी सकाळी मंदिराचे पुजारी नथू विठ्ठल देवाडे नेहमीप्रमाणे पूजेसाठी गेले असताना त्यांना मंदिरावर दरड कोसळली असल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती तात्काळ ग्रामस्थांना कळविल्याने माहिती मिळताच ग्रामस्थांनी मंदिराकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती तालुका प्रशासनाला दिली आहे. या वर्षी अवघ्या दोन महिन्यात झालेल्या दरडीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीती आहे.
वाचा:
मावळ तालुक्यातील आंदर मावळ खोऱ्यात कल्हाट हे १५० लोकवस्तीचे गाव आहे. संपूर्ण गाव उंच डोंगराच्या पायथ्याशी असून, येथील बहुतांश डोंगर हा दगडी कड्यांचा आहे. यामुळे मागे अनेकदा या डोंगराचे छोटे मोठे दगडी कडे कोसळले आहेत. मात्र सुदैवाने आतापर्यंतच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. २०१४ साली झालेल्या माळीण दुर्घटनेच्या दिवशी येथील डोंगराच्या कड्याला तडा जाऊन मोठी भेग पडली आहे. या दिवसापासून येथील ग्रामस्थ कोणत्याही क्षणी दरड कोसळेल या भीतीच्या दडपणाखाली राहत आहे. हे गाव दरड प्रवण क्षेत्रात असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. मात्र या गावासह मावळातील दरडीचा धोका असलेल्या एकाही गावच्या पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. सरकार आणि प्रशासनाने याची वेळेवर दखल न घेतल्यास ३० वर्षांपूर्वी १९९०-९१ ला मावळातील भाजे गावात झालेल्या व २०१४ लाख झालेल्या आंबेगाव तालुक्यातील माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती अटळ आहे.
आमचं कल्हाट गाव हे डोंगराच्या कड्याच्या पायथ्याशी आहे. गावाला दरडीचा मोठा धोका आहे. कधी मोठी दरड कोसळेल याचा नेम नाही. तरी शासन व संबंधित प्रशासनाने वेळीच याची दखल घेऊन या ठिकाणी माळीणची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी. व गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते पै. दिगंबर उर्फ धुंदाजी आगिवले यांनी केली आहे.
आदिवासी कातकरी पाड्याजवळही कोसळली दरड
लोणावळ्या जवळील कुसगाव बुद्रुक येथील ओळकाईवाडी येथील डोंगरावर असलेल्या आदिवासी कातकरी पाड्या जवळ मोठी दरड कोसळली आहे. सुदैवाने ही दरड येथील आदिवासींच्या झोपड्यांवर कोसळली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. ह्या वस्तीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात माती व दगडी सैल झाली असून, येथील एका कड्याला तडा गेला आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन येथील आदिवासींना सुरक्षित ठिकाणी हलवावे अन्यथा कोणत्याही क्षणी येथील आदिवासी कातकरी पाडा दरडीखाली गाढला जाईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times