: नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकचं उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मिराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकत भारताचं खातं उघडलं. या ऐतिहासिक कामगिरीनंतर देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. सोमवारी (26 जुलै) मीराबाईचं मायदेशात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी राजधानीत विमानतळावर क्रीडा प्रेमींनी मोठ्या संख्येत हजेरी लावली होती. टाळ्यांच्या कडकडाटात मीराबाईचं स्वागत करत मीराबाईचे आभारही मानले. मायदेशात येताच मीराबाईचं नशीब पालटलं असून आता तिला सरकारने मोठं बक्षीसही दिलं आहे.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी मीराबाईला 1 कोटी रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तसेच मणिपूर पोलीस दलात अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदाच्या नोकरीची ऑफर दिली आहे. विजयानंतर मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी तिच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘यापुढे रेल्वे स्टेशन किंवा ट्रेनमध्ये तिकीट गोळा करण्याचं काम करायचं नाही. मी तुमच्यासाठी एक विशेष पद राखीव ठेवत आहे.’

मायदेशात आल्यानंतर मीराबाई म्हणाली की, हा प्रवास आव्हानात्मक होता. 2016 पासून आम्ही याच्या तयारीला सुरवात केली होती. आणि रिओ ऑलिम्पिकनंतर सरावामध्ये बदल केला. माझे प्रशिक्षक यांनी आणि मी गेल्या पाच वर्षांपासून टोकियो ऑलिम्पिकसाठी झोकून दिले होते.

दरम्यान, 49 किलो वजनी गटात मीराबाईने 202 किलो वजन उचलले होते. स्नॅचमध्ये 87 किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो वजन तिने उचलले होते. ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी ती दुसरी तर वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. याआधी 2000च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती. भारतीय खेळाडूने मिळवलेले हे 18 वे वैयक्तिक तर महिला खेळाडूने मिळवलेले हे सहावे ऑलिम्पिक पदक ठरले आहे. 21 वर्षानंतर भारतीय महिला खेळाडूने वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here