वाचा:
राज्यातील ज्या भागात करोनाचे प्रमाण अत्यल्प आहे आणि आता स्थिती बऱ्याच अंशी सुधारली आहे, तेथे लागू असलेल्या कठोर निर्बंधांबाबत फेरविचार करून त्यात तातडीने शिथीलता देण्याची गरज आहे. अर्थकारण आणि आरोग्य यात सुवर्णमध्य साधतच आपल्याला करोनावर मात करावी लागेल. करोना विरोधातील लढाई ही एकांगी होता कामा नये. आर्थिक विवंचनेमुळे स्वत:चे जीवन संपविण्याच्या घटनांमध्ये वाढ होते आहे. कल्याणमध्ये व्यापाऱ्याने आत्महत्या केली, नालासोपाऱ्यात एका तरुणाने जीवन संपविले, चंद्रपूर येथे एका भोजनालय चालकाने आत्महत्या केली, असे नमूद करत देवेंद्र फडणवीस यांनी निर्बंधांमध्ये शिथीलता देण्याची आवश्यकता पत्रात अधोरेखित केली आहे.
वाचा:
नागपुरातील करोनाच्या गेल्या १० दिवसांतील स्थितीकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. १७ ते २७ जुलै या दहा दिवसांच्या कालावधीत नागपुरात एकूण झालेल्या चाचण्या ५९ हजार ९४८ इतक्या आहेत, तर त्यात करोना संसर्ग आढळून आलेले रुग्ण ५८ इतके आहेत. हे प्रमाण ०.१० टक्के इतके आहे. हे प्रमाण पाहता आता नागपुरात तातडीने निर्बंध शिथिल करण्याची गरज आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. सातत्याच्या निर्बंधांमुळे व्यापार संपत चालला आहे आणि त्यातून अर्थकारणावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. छोटे दुकानदार, व्यवसायीक यांना जगणे कठीण होऊन बसले आहे. हॉटेल्सचा व्यवसाय खरे तर दुपारी ४ नंतर सुरू होतो. पण, ४ वाजता सारे बंद करावे लागत आहे. व्यवसाय अडचणीत आल्याने नोकरदारांना वेतन देणे सुद्धा या व्यवसायिकांना कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे करोनाची स्थिती जेथे बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे, तेथे निर्बंधात तातडीने शिथीलता देण्याबाबतचा निर्णय घेण्यात यावा. नागपुरात तर सरासरी ५ रुग्ण दररोज आढळून येत असताना संपूर्ण नागपूर बंद ठेवणे योग्य नाही. नागपूरबाबत हा निर्णय तातडीने घेतला जावा, अशी मागणी या पत्रातून देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times