: नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहास आजपासून सुरुवात झाली असून नक्षल्यांनी ठिकठिकाणी बॅनर बांधून पत्रकेही टाकली आहेत. जिल्ह्यातील भामरागड तालुका मुख्यालयापासून जवळपास अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर आरेवाडा रस्त्यावर नक्षलवाद्यांनी पत्रके व बॅनर टाकून २८ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत शहीद स्मृती सप्ताह पाळण्याचं आवाहन केलं आहे.

कॉम्रेड चारू मुजुमदार यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह साजरा करतात. या दरम्यान ते जंगलव्याप्त भागात चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांची स्मारके बांधून त्यांना श्रद्धांजली वाहतात. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी भामरागड ते आरेवाडा मार्गावर तसंच एटापल्ली तालुक्यात आणि काही अन्य भागात नक्षल्यांनी बॅनर आणि पत्रके टाकून नागरिकांना चळवळीत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. तसंच खोब्रामेंढा, पैडी, मोरचुल इत्यादी ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये ठार झालेल्या नक्षल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षात शंभरहून अधिक नक्षलवाद्यांना पोलिसांनी चकमकीत ठार करून चळवळीला हादरा दिला आहे.

दरवर्षीच २८ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत नक्षलवाद्यांकडून शहीद स्मृती सप्ताह पाळला जातो. यादरम्यान नक्षल्यांकडून हिंसक घटना घडवण्यासह शासकीय संपत्तीची जाळपोळ केली जाते. या पार्श्वभूमीवर छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरील पोलिस ठाणे, उपपोलिस ठाणे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, नक्षलवाद्यांच्या शहीद स्मृती सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here