मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागात हवामान खात्याने (IMD) पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा (Maharashtra Rain) इशारा जारी केला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या कहरातून लोक अद्याप सावरू शकलेले नाहीत. पाऊस आणि पुरामुळे त्रस्त झालेल्या रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकट आहे.

हवामान खात्याने २९ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तविली आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह काही जिल्ह्यात हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला जात होता. परंतु परिस्थिती अतिवृष्टीच्या पलीकडे गेली होती आणि पूर परिस्थितीला सामोरे जावे लागले.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रायगड आणि रत्नागिरीमध्ये पुढचे चार दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यात पुढचे तीन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इतकंच नाहीतर कोल्हापूरमध्ये अतिवृष्टी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

२९ आणि ३० जुलैला ऑरेंज अलर्ट
येत्या ४८ तासांत काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे. २९ आणि ३० जुलैला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा अंदाज वर्तवताना हवामान खात्याने रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर येथे ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला असून पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here