वंचित बहुजन आघाडीचे ईशान्य जिल्हाध्यक्ष राहुल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी अशा एकूण ५०० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत विक्रोळी पश्चिमेकडील कैलास कॉम्प्लेक्स सभागृहात झालेल्या कार्यक्रमात या कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. यामुळं वंचित बहुजन आघाडीला मोठा फटका बसणार आहे. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीसह भाजपला पर्याय निर्माण करण्याचा प्रकाश आंबेडकर यांचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नांना खीळ बसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अकोला पाठोपाठ राज्यातील महत्वाच्या अशा मुंबई आणि उपनगरांतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक बंड केल्यानं ‘वंचित’ला हा मोठा हादरा बसल्याचं मानलं जात आहे.
तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीच्या राज्यभरातील प्रमुख नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे सामूहिकपणे आंबेडकर यांना पाठवले होते. राजीनामा दिलेल्यांमध्ये अकोला येथील माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांचा समावेश होता. यासह इतर पदाधिकारी आणि नेत्यांनीही राजीनामे दिले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times