मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या जी पश्चिम कार्यालयाचं उद्घाटन झालं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील करोना परस्थिती यशस्वीरित्या हाताळल्याबाबत महापालिकेचा गौरव केला. त्याचवेळी, त्यांनी सध्याचे करोना निर्बंध व लोकलबाबतही भाष्य केलं. ‘जिथं निर्बंध शिथील केले जाऊ शकतात, तिथं तसा निर्णय घेतलेला आहे. लोकल सुरू करण्याबाबतही विचार सुरू आहे. जबाबदारीचं भान ठेवूनच लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल,’ असं ते म्हणाले. ‘निर्बंध शिथील न झालेल्या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी नियम तोडू नयेत. संयम सोडू नये,’ असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
वाचा:
करोनाच्या संकट काळात मुंबई महापालिकेनं केलेल्या कामाचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी तोंडभरून कौतुक केलं. ‘करोना काळात मुंबई मॉडेलचं सर्वत्र कौतुक झालं. पालिका कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केल्यामुळंच हे शक्य झालं. करोनाला रोखण्याचं काम महापालिकेनं केला. धारावीसारख्या झोपडपट्टीत करोनाला हरवलं. संकटाचा मुकाबला करतानाच नागरिकांच्या सेवेतही खंड पडू दिला नाही. संकटाचा सामना करतानाच मुंबईत विकासकामंही सुरू आहेत,’ असं ते म्हणाले. ‘जी पश्चिमचं कार्यालयाचं बांधकाम दूरदृष्टी ठेवून केलं गेलं आहे. अनेक गोष्टी आधी मुंबईत बनतात, मग देशात होतात,’ असंही ते म्हणाले.
वाचा:
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आजच मुंबईतील लोकल ट्रेनबाबत केंद्राची भूमिका मांडली आहे. ‘लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घ्यावयाचा आहे. करोनाची स्थिती राज्य सरकार हाताळत आहे. त्यामुळं तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनी लोकल पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याची विनंती केल्यास आम्ही तात्काळ त्यावर निर्णय घेऊ,’ असं दानवे यांनी म्हटलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं हे विधान महत्त्वाचं मानलं जात आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times