उद्या सकाळी साडे अकरा वाजता चंद्रकांत पाटील राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट देतील असे वृत्त आहे. नाशिकमध्ये या दोन नेत्यांची भेट झाल्यानंतर त्यांच्यात काहीशी जवळीक वाढल्याचे दिसत होते. त्यात पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंचं कौतुक केल्यानंतर हे दोन पक्ष राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी एकत्र येऊ पाहत आहेत का या चर्चेला बळ मिळालं.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबई, ठाणे आणि पुणे, नाशिक, पिंपरीचिंचवडसह राज्यातील जवळजवळ १० महापालिकांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव टाकणाऱ्या या निवडणुका अत्यंत महत्वाच्या समजल्या जातात. इतकेच नाही तर पुढील वर्षी राज्यात महापालिकांसह जिल्हा परिषदांच्या देखील निवडणुका होत आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
भाजपला आहे मित्रपक्षाची आवश्यकता
शिवसेनेने भाजपची साथ सोडत राज्यात महाविकास आघाडी स्थापन करत सत्ता हस्तगत केली. यानंतर भाजप एकटा पडलेला आहे. शिवसेनेला शह देण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला एका चांगल्या मित्रपक्षाची आवश्यकता भासत असून त्याला तो मित्र मनसेच्या रुपात दिसू लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या चंद्रकांत पाटील राज ठाकरे यांच्यासोबत युतीबाबत चर्चा करतील का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
परप्रांतीयांच्या मुद्द्यावर चर्चा होणार?
राज ठाकरे यांच्या भाषणाची क्लिप आपण पाहिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. मी त्या क्लिप पाहिल्यात. त्यांच्या भाषणातील परप्रांतीयांविषयीच्या भूमिकेबद्दल काही शंका आहेत. त्या राज यांना भेटून विचारेन. मी माझं म्हणणं त्यांच्यासमोर ठेवेन,’ असं पाटील म्हणाले होते. त्यानुसार पाटील या मुद्द्यावर राज यांच्याशी चर्चा करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मनसेच परप्रांतीयांना असलेला विरोध ही युतीतील अडचण असल्याचे पाटील यांनी मान्य केले होते. ही अडचण दूर झाली तर आपली काही हरकत नसल्याचे ते म्हणाले होते. मात्र, युतीबाबतचा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही. आमचा पक्ष या संदर्भात निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times