मुंबईत लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी सध्या भाजपनं आंदोलन सुरू केलं आहे. सर्वसामान्यांमध्ये लोकल बंद असल्यामुळं नाराजी वाढत आहे. शिक्षण मंडळानं केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात बहुतेक पालकांनीही शाळा सुरू करण्यास पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळं लोकल आणि शाळा सुरू करण्याचा विचार सरकार गांभीर्यानं करत आहे. याच पार्श्वभूमीवर नीतेश राणे यांनी एक ट्वीट केलं आहे.
‘दोन दिवसांत लोकल चालू होणार, १७ ऑगस्ट पासून शाळा चालू होणार… मग कोविड लसीचे दोन डोस घेतलेल्यांना मंदिर दर्शन का नाही? हे सरकार नाक दाबल्याशिवाय काहीच करत नाही का?,’ असा सवाल नीतेश राणे यांनी केला आहे. ‘हिंदूंवर अन्याय करणं हा महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम झाला आहे,’ असा आरोपही नीतेश राणे यांनी केला आहे.
करोनाच्या पहिल्या लाटेनंतर राज्यात टप्प्याटप्प्यानं लॉकडाऊन उठवण्याची सुरुवात होताच भाजपनं मंदिरं उघडण्याची मागणी लावून धरली होती. त्यासाठी राज्यभरात घंटानाद आंदोलनही करण्यात आलं होतं. मात्र, राज्य सरकारनं खूप उशिरानं त्यावर निर्णय घेतला होता. करोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर भाजपनं पुन्हा तीच मागणी सुरू केली आहे. पंढरपूरच्या पायी वारीसाठी भाजपनं असाच आग्रह धरला होता. मात्र, सरकार झुकलं नाही. पायी वारीला परवानगी दिली गेली नाही. आता शाळा व लोकल सुरू करण्याचा विचार सरकारनं बोलून दाखवल्यानंतर भाजपनं पुन्हा धार्मिक स्थळं खुली करण्यासाठी दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times