नागपूर : करोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे वेगवेगळ्या देशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. करोनाला रोखण्यासाठी कठोर निर्बंध लादण्यात येत आहेत. राज्यातील ११ जिल्ह्यांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. मात्र असं असताना नागपुरात मात्र करोनाचे संकट कमी होतानाचे चित्र आहे. कारण आज जिल्ह्यामध्ये शुन्य करोनाची नोंद करण्यात आली आहे. तब्बल दीड वर्षानंतर जिल्ह्यात शुन्य रुग्ण नोंदवण्यात आल्याने नागपूरकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. (Nagpur Corona Update)

जिल्ह्यामध्ये सध्या १८३ अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आहे. तर गेल्या चोवीस तासात एकही नवा रुग्ण समोर आला नाही. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत घट होण्यामध्ये आणखी एका जिल्ह्याला यश मिळालं आहे. खरंतर, नागपुरात ११ मार्च २०२० रोजी करोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर काही दिवस एकही रुग्ण आढळला नाही. मात्र नंतर करोनाने शहर आणि ग्रामीणमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला होता. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र होतं. मात्र आता दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यातील बाधितांची संख्याही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.

शनिवारी आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात बरे होणाऱ्या करोना रुग्णांची टक्केवारी ९७.९१ टक्के इतकी होती. जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १८३ आहे.

निगेटिव्ह अहवालामुळे संभ्रम
जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या करोनाच्या अहवालात शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शून्य दाखविण्यात आली होती. पालकमंत्री नितीन राऊत यांनीही यावर समाधान व्यक्त करून नागपूरकरांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले होते. शनिवारी कळमन्यातील एका व्यक्तीने दोनदा करोनाच्या तपासण्या केल्या, यातील पहिला अहवाल निगेटिव्ह आणि दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आढळल्याने संभ्रम निर्माण झाला होता. पण यानंतर रविवारी मात्र एकही रुग्ण समोर आला नाही.

दरम्यान, करोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी ती वाढू नये यासाठी नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज जिल्हाधिकारी आर. विमला आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here