मीरा भाईंदर येथे सरनाईक यांच्या पुढाकारानं उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचं लोकार्पण आज मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. टॉप्स सेक्युरिटी व अन्य प्रकरणांमध्ये सध्या प्रताप सरनाईक यांची ईडी चौकशी सुरू आहे. या चौकशीला कंटाळून सरनाईक यांनी अलीकडंच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. भाजपशी पुन्हा जुळवून घ्या म्हणजे आमचा त्रास थांबेल, अशी विनंती सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. त्यांच्या या पत्रामुळं एकच खळबळ उडाली होती. उद्धव ठाकरे यांनी आज प्रथमच त्यावर भाष्य केलं. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना जोरदार टोले हाणले. ‘सरनाईक यांच्या मागे काही करंटे लोक लागले असताना देखील जराही न डगमगता ते शिवसैनिकाचा सेवेचा वसा जपत आहेत. जिद्दीनं जनतेच्या हिताची कामं करत आहेत,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.
वाचा:
‘क्रिकेटमध्ये स्लेजिंग नावाचा प्रकार असतो. एखादा खेळाडू चांगली फलंदाजी किंवा गोलंदाजी करत असेल तर काही तरी करून त्याचं लक्ष विचलित केलं जातं. त्याची लाइन, लेंथ बिघडवली जाते आणि त्याला बाद केले जाते. असा काहीसा घाणेरडा प्रकार राजकारणात आलाय. पण सरनाईक यांनी त्यांच्या कामानं त्यास चोख उत्तर दिलंय. प्रताप सरनाईकांना जे अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी प्रताप सरनाईकांच्या लोकोपयोगी कामाची स्पर्धा करून दाखवावी,’ असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिलं.
करोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही!
करोनाच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य करणाऱ्यांनाही मुख्यमंत्र्यांनी टोला हाणला. ‘करोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी काय-काय प्रयत्न करावे लागले याची काही लोकांना जाण नाही आणि भानही नाही. लाट ओसरताच अमूक सुरू करा, तमूक सुरू करा, अशी आंदोलनं करताहेत, असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘आंदोलनं कसली करता? करोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही. इथं काही मोफत करोना वाटप सुरू नाहीए. आंदोलनच करायचं असेल तर जास्तीत जास्त ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचं आंदोलन करा.’
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times