१४ ते १६ ऑगस्ट दरम्यान राज्यात बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचा परिणाम राज्यभर होणार असून कोकणसह मध्य महाराष्ट्रातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. इतकंच नाहीतर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विकेंडनंतर सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांना यलो अलर्टदेखील जारी करण्यात आला आहे.
१६ ऑगस्टला म्हणजेच सोमवारी पुणे, अहमदनगर, औरंगाबाद आणि जालना या चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
खरंतर, गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, कोकण, विदर्भ आणि सर्वदूर भीषण परिस्थिती ओढावली होती. मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. पण सध्या जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस सुरू आहे.
हवामान खात्याने 15 ऑगस्टनंतर पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात सर्वदूर पाऊस होणार अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. इतकंच नाही तर कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि यावेळी विदर्भ आणि मराठवाडामध्ये चांगला पाऊस होईल असा हवामान खात्याने म्हटले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times