मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मंत्रालयात ध्वजारोहण पार पाडले. त्यावेळी ते बोलत होते. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राज्यातील ४ पोलिसांना राष्ट्रपती पदकं मिळाली आहेत. त्यासोबत पोलीस खात्यातील अजून ४० ते ४५ पोलीस खात्यातील बहाद्दर आहेत. त्यांचं अभिनंदन करतो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
गेल्या दीड वर्षापासून करोनाचं संकट आहे आणि त्यातून मुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. १६ ऑगस्टपासून राज्यातील काही बंधनं शिथिल करतो आहोत. पण करोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. काही देशांत ते पुन्हा उसळलं आहे. आपल्याकडे ते उसळू नये, यासाठी काळजी घ्यायला हवी. शिथिलतेसोबतच इशाराही दिला आहे, तोही नागरिकांनी लक्षात घ्यावा. करोना काळात आपण आरोग्यसुविधा वाढवत आहोत. पण ऑक्सिजनची कमतरता चिंतेचा विषय आहे. म्हणून ही शिथिलता देत असताना ऑक्सिजनच्या साठ्याचं प्रमाण ठरवून आपण ही शिथिलता दिली आहे. त्यामुळे कृपा करून दिलेल्या शिथिलतेमध्ये आवश्यक असलेले निर्बंध पाळावे लागतील. कारण ऑक्सिजनचा पुरवठा त्या मर्यादेच्या पुढे गेला, तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
करोनाशी लढताना एका गोष्टीचं समाधान आहे की लसीकरणानं वेग घेतला आहे. कालच राज्यानं साडेनऊ लाख लोकांना लसीकरण करून एक वेगळा उच्चांक प्रस्थापित केला आहे. आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करतो आहोत. आज सगळ्यांनी निश्चय केला पाहिजे, की मी माझा देश करोनामुक्त करणारच आणि पुढचा स्वातंत्र्यदिन मुक्त वातावरणात उत्साहात साजरा करणारच ही प्रतिज्ञा आपण करुयात, असं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times