सांगली : गरिबातील गरीब माणसाला प्रगतीतील वाटा मिळावा यासाठी धनिकांनी स्वत:हून रेशनचे धान्य सोडावे, असं आवाहन पालकमंत्री यांनी केलं आहे. गरजू पूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी मोठे शेतकरी, ज्यांच्या घरात गाड्या आहेत, एसी आहे अशा धनिकांनी रेशनचे धान्य घेऊ नये. हे धान्य गरजू पूरग्रस्तांपर्यंत पोहोचावे, अशी अपेक्षा मंत्री पाटील यांनी व्यक्त केली. राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या पार्श्वभूमीवर ते रविवारी सांगलीत बोलत होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले की, सांगली हा निसर्गाचे वैविध्य नेहमीच अनुभवणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याने सन २००५, २०१९आणि आता जुलै २०२१ चाही महापूर आणि अतिवृष्टी अनुभवली. सन २००५ आणि २०१९ च्या महापुराचा अनुभव गाठीशी असल्याने हवामान खात्याने दिलेल्या अतिपावसाचा इशारा गांभीर्याने घेत प्रशासनाबरोबरच आपण सर्वजण सुरुवातीपासून सजग होतो. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील समन्वयामुळे महाप्रलय टळला. या महापुरात जिल्ह्यात एकही जीवितहानी झाली नाही, हे प्रशासनाचे फार मोठे यश आहे.

‘लाखो लोकांचे स्थलांतर’
‘महापुराची तीव्रता वाढत असतानाच पूरप्रवण भागातील नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत तात्काळ स्थलांतरासाठी प्रतिसाद देऊन सहकार्य केले. महापुराचा फटका जिल्ह्यातील ४ तालुक्यातील १०३ गावांना मोठ्या प्रमाणावर बसला. जवळपास २ लाख नागरिक आणि ३६ हजार जनावरे स्थलांतरीत करावी लागली. २४७ गावांमधील ४१ हजार हेक्टर कृषी क्षेत्र बाधित झाले आहे. तर ४० हजार कुटुंबे पूरबाधित झाली आहेत. व्यापार, उद्योग, रस्ते, पूल, पशुधन, घरे यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्वांचे पंचनामे जवळपास पूर्ण होत आले आहेत,’ अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाचीही केला उल्लेख
‘प्रत्येक पूरबाधिताला त्यांच्या हक्काचे अन्नधान्य मिळावे याबाबत पुरवठा विभागाला दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. महापुरातून झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी तसेच महापुराच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. करोनाचे संकट महाभयानक असल्याने सर्वच स्तरावरची आर्थिक स्थिती अडचणीची असली तरी शासन पूरबाधितांना वाऱ्यावर सोडणार नाही. आपत्तीग्रस्तांसाठी शासनाने एन.डी.आर.एफ च्या निकषांच्या पुढे जावून मदतीचे धोरण अवलंबिले आहे. गरजू पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचावी यासाठी मोठे शेतकरी आणि धनिकांनी रेशनिंगचे धान्य घेऊ नये. मोठे शेतकरी, ज्यांच्या घरात वाहने आहेत, ज्यांच्याकडे एसी आहे, नोकरदार आहेत त्यांनी रेशनिंगच्या धान्याचा मोह टाळावा. यामुळे खऱ्या गरजू लोकांना अन्नधान्य मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे गॅसवरील सबसिडी सोडण्याचे आवाहन केले होते, त्याप्रमाणे रेशनिंगच्या बाबतीतही धनिकांनी सहकार्य करावे,’ असंही जयंत पाटील म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here