नासीर नुरअहमंद शेख (वय ३०, रा. वडाचीवाडी, उंड्री), पुनित सतबीर काद्यान (वय ३५, रा. हरियाणा) आणि शरत विजयन नायर (वय ३४, रा. चेन्नई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या तिघांना २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला.
अमली पदार्थ विरोधी पथकाकडून शहरातील अमली तस्करांची माहिती काढण्याचे काम सुरू होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी योगेश मोहिते यांना माहिती मिळाली, की नासिर शेख हा त्याच्या फ्लॅटमध्ये अमली पदार्थ बाळगून त्याची विक्री करत आहे. त्यानुसार अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला.
यावेळी नासीर, पुनित व शरत हे तिघे त्या ठिकाणाहून चरस, गांजा व हशिश तेल या अमली पदार्थाची विक्री करत असल्याचे आढळून आले. पोलिसांना त्यांच्या फ्लॅटमधून गांजा, हशीश तेल आणि चरस असा तीन लाख २३ हजार रूपयांचा मुद्देमाल मिळाला. तो पोलिसांनी पंचासमक्ष जप्त केला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींविषयी धक्कादायक माहिती
या गुन्ह्यातील आरोपी पुनित हा पूर्वी आयटी कंपनीत काम करत होता. पण, त्याची नोकरी गेल्यानंतर त्याने पाचवी ते नववी पर्यंतच्या मुलांचे क्लास घेण्यास सुरुवात केली. सध्या तो ऑनलाईन क्लास घेत आहे. तोच हरियाणा येथून चरस, गांजा आणि हशिश तेल मागवत होता. त्यानंतर हे पदार्थ तो नासिरला विक्रीसाठी देत होता. शरत हा मूळचा चेन्नईचा असला तरी तो आणि पुनित हे पूर्वी एका कंपनीत नोकरीला होते. त्यामुळे त्यांची ओळख असून एका महिन्यापासून पुनितसोबत शरत राहत असल्याचे आढळून आले आहे. आरोपी हे अमली पदार्थ कोणाला विकत होते, याचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times