दिल्ली हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत लष्कराचा पाचरण करण्याची मागणी करण्यात आली. पण गृहमंत्रालयाने याला नकार दिलाय. केंद्रीय सुरक्षा दल आणि पोलीस योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळत आहेत, असं सांगण्यात आलं. तर अमित शहा यांनी दिल्लीकर जनतेला शांततेचं आवाहन केलंय. आफवांवर विश्वास ठेवू नका, असं म्हटलंय.
दिल्लीतील हिंसाचारात एका पोलीस कॉन्स्टेबलसह १३ जण ठार झालेत. हिंसाचारात ५६ पोलिस आणि १३० नागरिक जखमी झालेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय, अशी माहिती दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एम. एस. रंधवा यांनी दिली. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही पोलिसांनी केलंय. सुरक्षेत वाढ करण्यात आली असून सीआरपीएफ, आरएएफ आणि एसएसबीच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ अधिकारी सतत गस्त घालत आहेत. आजही काही भागात हिंसक घटना घडल्या, असं रंधवा म्हणाले. तर हिसांचारात १३ जण ठार झाल्याची माहिती गुरू तेग बहादूर हॉस्पिटलने दिलीय. एएनआयने हे वृत्त दिलंय.
ड्रानद्वारे केली जातेय टेहाळणी
तणावग्रस्त भागात ड्रोनद्वारे टेहाळणी करण्यात येत आहे. तसंच हिंसाचार झालेल्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. समाजकंटकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. हिंसेच्या घटनेनंतर भजनपुरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आलीय. तर खजुरीखासमध्ये रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात करण्यात आलीय.
चांदबागमध्ये दुकानं पेटवली
चांदबागमध्ये संध्याकाळी जाळपोळ करण्यात आली. काही दुकानं पेटवण्यात आली. एक बेकरीचे दुकान आणि फळांचे दुकान पेटवण्यात आले. तसंच दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रू धुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पण त्याला यश न आल्यानं अखेर निम लष्करी दलाच्या तुकड्या या भागात तैनाक करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, हिंसाचारग्रस्त भागातील शाळा, कॉलेजेस उद्या बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच उद्या होणाऱ्या परीक्षाही पुढे ढकलण्यात येणार आहेतः मनिष सिसोदिया, उपमुख्यमंत्री
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times