पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांनाच लाच प्रकरणात एसीबीने थेट पालिकेत अटक केली आहे. या प्रकरणानंतर शिवसेनेनं भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. तसंच, मुंबई महानगर पालिकेच्या कारभारावर सातत्याने टिका करणाऱ्या भाजप नेत्यांवरही शिवसेनेनं खडे बोल सुनावले आहेत. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपवर टीका केली आहे.
‘बुधवारच्या स्थायी समितीच्या सभेत ३२ कोटींच्या टक्केवारीचा हिशोब सुरू असतानाच पोलिसांनी धाड घातली. स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे, त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे आणि तीन कर्मचाऱ्यांना अटक केली. ३२ कोटींच्या टक्केवारीचा हिशोब सुरू असतानाच पोलिसांनी धाड घातली. एखाद्या महानगरपालिकेत अशा प्रकारचे धाडसत्र प्रथमच झाले असेल. नाकाने कांदे सोलणाऱ्यांचे त्यामुळे नाकच कापले गेले, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
‘मोदी लाटेत पक्षांतर घडवून अनेक नगरपालिका, महानगरपालिका भाजपने जिंकल्या. कुठे थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणून आणले, पण शेवटी या घाऊक मंडळींनी पक्षाचे व शहराचे चेहरे विद्रुप केले. जनतेच्या पैशांची घाऊक लूट करायची व बोट मात्र फक्त मुंबईकडे दाखवायचे. हा यांचा कावा शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेसचे सरकार महाराष्ट्रात आहे म्हणून,’ असा आरोपही शिवसेनेनं केला आहे.
‘सरकारमधील प्रमुख मंडळींच्या मागे ईडी वगैरे लावली जाणे हा तर नतद्रष्टपणाचा कळस आहे. पण काल पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत जे भ्रष्टाचाराचे प्रकरण दिवसाउजेडी घडले तेथे तुमचे ते ईडीचे भाजप पुरस्कृत पथक घुसवणार आहात काय?,’ असा सवालही शिवसेनेनं केला आहे.
‘सगळ्यांच्या डोळ्यांदेखत स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या एजंटला लाच स्वीकारताना पकडले यला भाजपावाल्यांनी षडयंत्र म्हणणे म्हणजे भ्रष्टाचाराची व्याख्याच बदलण्यासारखं आहे. इतरांनी असे पैसे घेतले तर तो भ्रष्टाचार आणि स्वत:चे बरबटलेले हात पोलिसांच्या बेड्यांत अडकले, तर तो मात्र षडयंत्राचा प्रकार,’ असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times