चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सलग काही ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, ‘मला हे जाणून अत्यंत आनंद झाला आहे की, आपण आपला महत्त्वपूर्ण वेळ काढून मोदीविरोधी पक्षांचे नेतृत्व करणे स्वीकारले. तुम्ही अगदी योग्य म्हणालात सध्याचा काळ तुम्हा सर्वांसाठी अंधारमय झालेला आहे आणि पुढील निवडणुकांमध्येही तुम्हाला विरोधी पक्षातच बसायचे आहे,’ असं चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना उद्देशून म्हटलं आहे.
‘राज्यातील शेतकऱ्यांवर भयंकर पूरस्थिती ओढवली शेतीचे अतोनात नुकसान झाले. मात्र अजूनही तुमच्या सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत केली नाही. त्यांना आश्वासन आणि दुर्लक्ष याशिवाय तुम्ही काय दिले?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसंच, यावरुन तुमचे शेतकऱ्यांवरील प्रेम दिसून येते,’ असा टोलाही लगावला आहे.
‘मोदी सरकारच्या कृषी कायद्यांमुळं शेतकऱ्यांसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. लाखो शेतकरी याचा लाभ घेत आहेत. जे तुम्हाला इतके वर्ष शेतकऱ्यांसाठी जे जमले नाही, ते मोदी सरकारने करुन दाखवले,’ अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
‘आदर्श लोकशाही कशी असावी हे मोदी सरकारच्या धोरणांकडे पाहून तुमच्या लक्षात आले असेल. लोकशाही कशी उभारली जाते आणि कशी नियंत्रणात ठेवली जाते, याचे उदाहरण जम्मू-काश्मीर आहे. तुम्हाला शक्य नसलेली प्रत्येक गोष्ट मोदी सरकारने अवघ्या ७ वर्षात करून दाखवली आहे,’ असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times