पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडंच फाळणीचा दिवस ‘फाळणी वेदना दिन’ म्हणून दरवर्षी स्मरण करण्याची घोषणा केली आहे. मोदींच्या या घोषणेच्या अनुषंगानं संजय राऊत यांनी ‘सामना’त लेख लिहिला आहे. त्यातून त्यांनी फाळणीच्या आठवणी जागवण्याच्या मोदी सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे. राऊत यांनी लेखात सध्याच्या अफगाणिस्तानचा संदर्भ दिला आहे. ‘एका देशाचं अस्तित्व आणि अखंडत्व खतम होण्याची वेदना काय असते ते आज अफगाणिस्तानात दिसतेय. देशाला नरकात ढकलून अफगाणिस्तानचे राज्यकर्ते पळून गेले आहेत. आपल्याला स्वातंत्र्य मिळत असतानाही काय घडत होते? देशाची फाळणी होऊ नये व देश अखंड राहावा असं वाटणारी मंडळी त्यावेळी काय करीत होती?,’ असा सवाल राऊत यांनी केला आहे.
वाचा:
‘भारताची फाळणी हा एक भयपट होता. जनतेच्या हृदयातील घावच होता. तो घाव आजही भरलेला नाही. पण स्वातंत्र्यानंतर फाळणीस फक्त गांधी-नेहरू-काँग्रेसलाच जबाबदार ठरविण्याची स्पर्धा सुरू झाली. कारण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात वीर सावरकर, श्यामाप्रसाद मुखर्जी, लोहियांसारखे मोजके नेते सोडले तर फक्त काँग्रेस आणि त्यांचे नेतेच होते. मुसलमानांना अधिक काही देणार नाही हे तेव्हा गांधींचं धोरण होतं, असं राऊत यांनी म्हटलं आहे. देश स्वतंत्र होताच पं. नेहरूंनी मुसलमानांचा राखीव मतदारसंघ रद्द करून टाकला. मुसलमानांसाठी दिलेल्या सोयी-सवलती रद्द करून टाकल्या, ही गोष्ट राजकीय हिंदुत्ववाद्यांनी लक्षात घ्यायला हवी, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
आज फाळणीच्या वेदना जागवून काय होणार? वेदना कशी शांत होणार?, असा सवाल राऊत यांनी केला आहे. ‘फाळणी करून तोडलेली भूमी पुन्हा आपल्या देशात सामील केली जाईपर्यंत राष्ट्रभक्त जनतेच्या मनात शांतता लाभणार नाही आणि देशातही शांतता नांदणार नाही. प्रत्येक हिंदूंच्या मनात ही फाळणीची जखम ठसठसत आहे. भारत पूर्वीप्रमाणे अखंड व्हावा असं प्रत्येकाला वाटत असलं तरी ते शक्य दिसत नाही, पण आशा अमर आहे. पंतप्रधान मोदी यांना अखंड राष्ट्र करायचंच असेल तर स्वागतच आहे. पण फाळणी करून तुटलेल्या पाकिस्तानातील ११ कोटी मुसलमानांचे काय करणार? त्यावरही त्यांनी भाष्य करावं,’ असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times