केंद्रीय मंत्री राणे यांना झालेल्या अटकेचा विखे पाटील यांनी निषेध केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘मंत्री राणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. राज्यात केंद्रीय मंत्र्यांच्या सुरू असलेल्या यात्रांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे महाविकास आघाडी सरकार अस्वस्थ झालं आहे. त्यामुळे जनतेचं लक्ष विचलीत करण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. यापूर्वी भाजपच्या नेत्यांवर शिवसेनेकडून अतिशय खालच्या स्तरावर जाऊन टीका केली गेली. त्यावेळी पोलिसांना कायदा आठवला नाही. आजपर्यंतच्या झालेल्या दसरा मेळाव्यातील शिवसेना नेत्यांची वक्तव्यही पोलीस प्रशासनने दुर्लक्षित केली. मग पोलिसांना कायद्याचा साक्षात्कार आताच कसा झाला?’ असा प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केला.
शिवसेनेला इशारा
‘पोलीस बळाचा वापर करून राज्य सरकारने निर्माण केलेले वातावरण आणि दहशत अतिशय दुर्दैवी आहे. भाजप कार्यालयावर आणि कार्यकर्त्यांवर झालेले हल्लेसुध्दा सरकार पुरस्कृत आहेत. राज्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी अतिशय संयम बाळगला आहे. पण अधिक अंगावर येण्याचा कोणी प्रयत्न केलाच तर जशास तसे उतर देण्याची आमची तयारी आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नारायण राणे यांना अटक केल्यानंतर राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसंच अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यालयांवरही हल्ले करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांना कायदा-सुव्यवस्थेबाबत अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times