मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे यांच्यावर राज्यातील विविध शहरांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे एका ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात जामीन मिळाला तरी इतरत्र जे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत, त्यामध्ये राणेंना पुन्हा अटक होणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मात्र आता राणेंना पुन्हा ताब्यात घेतलं जाणार नसल्याची माहिती आहे.
जामीन मिळाल्यानंतर काय म्हणाले राणेंचे वकील?
महाड कोर्टात राणे यांच्यावरील गुन्ह्याबाबत सुनावणी होत असताना राणे यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात अत्यंत आक्रमकपणे बाजू मांडण्यात आली. नारायण राणे यांच्याकडून वकील अनिकेत उज्वल निकम यांनी बाजू मांडली. ‘नारायण राणे यांच्यावर चुकीची कलमे दाखल करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा,’ अशी मागणी निकम यांनी केली. तर याबाबत आक्षेप घेत सरकारी वकिलांनी राणेंना ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली. दोन्ही बाजू ऐकूण घेतल्यानंतर न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर राणे यांना जामीन मंजूर केला.
दरम्यान, नारायण राणे यांना जामीन देताना कोर्टाने काही अटीही घातल्या आहेत. राणे यांनी यापुढे अशा प्रकारची वक्तव्ये टाळावीत, तसंच पुढील सोमवारी आणि १३ सप्टेंबर रोजी पोलीस स्थानकात हजर राहावं, अशा सूचना कोर्टाकडून राणे यांना देण्यात आल्या आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times