मुंबई वातावरण कृती आराखड्याचं सादरीकरणही आज करण्यात आलं. ‘वातावरण बदलाचे आव्हान परतवण्यासाठी व्यापक व सर्वसमावेशक असं धोरण तयार करणं हे या आराखड्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. कृती करण्याची हीच योग्य वेळ असून, त्यात दिरंगाई झाली तर पुढील दशकभरात मुंबई शहर राहण्यासाठी अयोग्य ठरेल,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले. ‘मुंबईच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करतानाच वातावरण बदलांबाबतची कृती मुख्य प्रवाहात आणल्यामुळे शहरातील नैसर्गिक रचनेचे संरक्षण, संवदेनशील समूहाची सक्षमता वाढवणे आणि शहराची समृद्ध वाढ शक्य होऊन शहरातील हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात प्रभावी घट करता येईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वाचा:
यावेळी तज्ज्ञांनीही आपापले विचार मांडले. ‘मुंबईतील तिवरांची जंगले कमी झाली. शहराचा हिरवा पट्टा धोक्यात आहे. वातावरणातील ग्रीन कव्हर कमी होत चालले आहे. पावसाचा लहरीपणा वाढतो आहे. दररोज १०० ते २०० मिमी पाऊस पडण्याचे प्रमाण वाढते आहे. गेल्या दीड वर्षात तीन चक्रीवादळे मुंबईने अनुभवली आहेत. २०५० पर्यंत ए, बी, सी, डी हे वॉर्ड ७० टक्के तर कफ परेड, नरीमन पॉइंट परिसर ८० टक्के पाण्याखाली जाईल,’ अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.
‘वातावरणीयदृष्ट्या शहरी पूर आणि वाढते तापमान ही दोन महत्वाची आव्हाने मुंबई शहरापुढे आहेत. ‘गेल्या ५० वर्षांतील तापमानाचा कल पाहता त्यात स्थिर अशी वाढ दिसून येते. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी तापमानातील अनियमितता, नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे हिवाळी महिने उन्हाळी महिन्यांपेक्षा अधिक वेगाने उष्ण होताना दिसतात, याकडं डॉ. संजीव कुमार यांनी लक्ष वेधलं.
वाचा:
‘भारतीय हवामान विभागाच्या वर्गवारीनुसार एका दिवसात ६४.५ मिमी ते ११५.५ मिमी पाऊस म्हणजे ‘मुसळधार’, ११५.६ ते २०४.४ मिमी पाऊस म्हणजे ‘अति मुसळधार’ आणि २०४.५ मिमीपेक्षा अधिक पाऊस म्हणजे ‘अतिवृष्टी’ असे आहे. २०१७ ते २०२० या चार वर्षात अतिवृष्टीच्या घटनांमध्ये स्थिर पण सातत्याने वाढ होताना दिसते. म्हणजेच मुंबईतील अतिवृष्टीची वारंवारता ही विशेषत: गेल्या चार वर्षात वाढत आहे, असे डब्ल्यूआरआय इंडिया रॉस सेंटर ऑफ सस्टेनेबल सिटीजच्या सहयोगी संचालक लुबैना रंगवाला यांनी नमूद केले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times