छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामी व दादोजी कोंडदेव यांनी खेळाच्या माध्यमातून असं शिक्षण दिलं होतं, की ज्यामुळं शिवाजी महाराज राष्ट्रनायक ठरले,’ असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं. कोल्हे यांनी या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. ‘राजनाथ सिंह यांनी चुकीच्या किंवा ऐकीव माहितीवर हे विधान केलेलं असावं. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेसाठी निर्माण केलेल्या कल्याणकारी राज्यामुळे आणि त्या स्वराज्याला असलेल्या नैतिक अधिष्ठानामुळे राष्ट्रनायक ठरले, असं कोल्हे यांनी म्हटलं आहे.
वाचा:
‘शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या प्रयत्नांबद्दल दादोजी कोंडदेव हे नाराज होते. आदिलशाहीच्या दरबारात शहाजी महाराजांना याचा त्रास तर होणार नाही ना, अशी स्वामीनिष्ठा त्यापाठी होती, असं ऐतिहासिक कागदपत्रांचा धांडोळा घेतल्यानंतर समजतं. तसंच, शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट ही १६७१ च्या आसपास झाल्याचं काही ऐतिहासिक कागदपत्रं दाखवून देतात. त्यावेळी स्वराज्य पूर्णत्वास आलेले होते, असंही कोल्हे यांनी सांगितलं.
‘आपला जाज्वल्य इतिहास हा निःपक्षपातीपणाने, तर्कसंगत पद्धतीने, अकारण कुणाचेही स्तोम माजवून एकमेकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न टाळून राज्य, देश आणि जगभरात सांगण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ‘दोन दिवसापूर्वीच एक हिंदी दिग्दर्शक मुघल शासक हे राष्ट्रनिर्माते आहेत असं म्हणाला होता. हे सगळं पाहून इतिहास योग्य पद्धतीनं सांगण्याची गरज आणखी प्रकर्षानं जाणवत आहे. केवळ निषेध किंवा एखादे आंदोलन हे क्षणिक ठरू शकते. ही वैचारिक लढाई असून ती त्याच माध्यमातून लढली गेली पाहिजे. साहित्य, कला याचा समाजमनावर दीर्घकालीन परिणाम होतो, त्या माध्यमातून आपण निःपक्षपाती, तर्कसंगत इतिहास जगभर पोहोचवला पाहिजे,’ असं कोल्हे यांनी म्हटलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times