ईशान्य दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचारात एका हेड कॉन्स्टेबलसह अनेकांचा बळी गेला आहे. संवेदनशील भागात दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी ईशान्य दिल्लीतील संवेदनशील भागांचा दौरा केला. त्यांनी सीलमपूर, भजनपुरा, मौजपूर, यमुना विहार आदी भागांतील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तर या हिंसाचाराच्या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसनं दिल्लीतील हिंसेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जबाबदार धरलं आहे. दिल्लीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट असून दिल्लीत उद्भवलेल्या स्थितीला केंद्र सरकार, गृहमंत्री अमित शहा जबाबदार असून ही जबाबदारी स्वीकारत गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही दिल्लीच्या घटनेला अमित शहा जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. हिंसाचाराच्या घटनेला शहा जबाबदार असून, त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची चौकशी करावी, असं त्या म्हणाल्या. आपल्या देशात अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. मग असं स्वागत करत आहात का, असा सवाल करत, हे गुप्तचर यंत्रणेचं अपयश आहे, असा आरोपही त्यांनी केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times