शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या सदरातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. तसंच, भाजपचे नेते व नारायण राणेंचे पुत्र नितेश व निलेश राणे यांच्यावरही जोरदार टीका केली आहे.
‘उद्धव ठाकरे व इतरांवर धोरणात्मक टीका करणे समजू शकतो. तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, पण राणे व त्यांची दोन्ही मुले राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या ठाकरे यांच्याविषयी जी भाषा वापरतात तो भाजपच्या नव्या संस्कृतीचा उदय आहे! राणे व त्यांच्या मुलांनी काँग्रेस पक्षात असताना नरेंद्र मोदी, वीर सावरकर यांच्याविषयी याच असभ्य भाषेचा वापर केला होता. घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींचा एकेरी पद्धतीने अपमानास्पद उल्लेख करण्याचा अधिकार राणे व त्यांच्या मुलांना कोणी दिला?,’ असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
‘राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेत सर्व क्रांतिकारकांचाच अपमान केला आहे. वीर सावरकरांवर असभ्य भाषेत राणेपुत्रांनी केलेली विधाने आजही सोशल मीडियावर आहेत. भाजप त्यावर काय बोलणार?,’ असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
‘नारायण राणे यांच्यामुळं महाराष्ट्र भाजपमध्ये बहुजन समाज विरुद्ध इतर अशी फाळणी होईल. राणेच ती करतील. त्या विघटनास सुरुवात झाली आहे. या सगळ्या वातावरणात भाजप स्वतःची ओळख आणि अस्तित्व हरवताना दिसत आहे. आज राणे, लाडसारखे नेते भाजपचा मुखवडा म्हणून वेगळे प्रताप घडवीत आहेत व फडणवीस मागे पडले आहेत. आशिष शेलारांसारखे नेते ठरवून बाजूला केले आहेत. राजकीय मतभेदांपलीकडेचे हे विचार आहेत,’ असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times