केंद्र सरकारने एल्गार परिषद गुन्हा हा एनआयएकडे तपासासाठी दिला आहे. त्यानंतर पुण्यातील कोर्टाने देखील या गुन्ह्याची सर्व कागदपत्रे एनआयए कोर्टात पाठविण्याची परवानगी दिली होती. तसेच, या गुन्ह्यातील नऊ आरोपींना २८ फेब्रुवारीपर्यंत एनआयए कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश दिले होते. एल्गार परिषद खटला हा आता मुंबईतील एनआयएच्या कोर्टात चालणार आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींना कोर्टात हजर करणे सोपे व्हावे यासाठी सर्व आरोपींना मुंबईतील कारागृहात हलविले आहे.
या गुन्ह्यातील नऊ आरोपी सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, वर्णन गोन्साल्वीस, सुधीर ढवळे, रोना विल्सन, अरुण फरेरा, सुधा भारद्वाज, शोमा सेन आणि वरवरा राव येरवडा मध्यवर्ती कारागृहात होते. एनआयए कोर्टाच्या आदेशानुसार येरवडा मध्यवर्ती कारागृहातील या सर्व नऊ जणांना बुधवारी मुंबईला हलविण्यात आले आहे. त्यामधील सात आरोपी ऑर्थर रोड कारागृहात, तर दोन महिला आरोपींना भायखळा कारागृहात ठेवण्यात येणार आहे.
एल्गार परिषद गुन्ह्यात सुरुवातीला राज्य व केंद्र सरकार समोरासमोर उभे राहिले होते. मात्र, नंतर राज्य सरकारने हा गुन्हा एनआयएकडे वर्ग करण्यास समंती दिली. तरीही राज्य सरकारमधील काही घटक पक्षांकडून या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्याची मागणी केली होती. याबाबत कायदेशीर सल्ला मागविला असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times