करोनाच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या लाटा जाणीवपूर्वक आणल्या जात आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. ‘लॉकडाऊनचा फायदा घेऊन हजारो कोटींची कामं वाजवली जाताहेत. त्या विरोधात कोणी काही बोलू नये, मोर्चे काढू नये, सभा घेऊ नये म्हणून करोनाच्या लाटा आणल्या जात आहेत. लाटा यायला काही समुद्र आहे का? विनाकारण इमारती सील करायच्या. याआधी देशात काही रोगराई आलीच नव्हती का?,’ अशी विचारणा राज यांनी केली.
वाचा:
‘राज्यात कुठेच काही बंद नाही. सगळं काही सुरू आहे. राजकीय पक्षांचे मेळावे सुरू आहेत. जन आशीर्वाद यात्रा सुरू आहेत. नारायण राणे आणि शिवसेनेच्या लोकांच्या हाणामाऱ्या सुरू आहेत. बाळासाहेबांच्या नावानं हडपलेल्या महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या रोजच्या रोज येताहेत. त्यांची संख्या कमी झालेली नाही. त्यांच्यासाठी लॉकडाऊन नाही. फक्त दहीहंडी किंवा सण-उत्सव आले की लॉकडाऊन लागतो. सणांमधूनच करोना पसरतो का?,’ असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी केला. ‘ह्यांना जेवढं हवं आहे, तेवढं चालवायचं. बाकीच्यांना बंद करून ठेवायचं आणि जनतेला घाबरवून ठेवायचं. त्यामुळं दहीहंडी दणक्यात साजरा करण्याचा निर्णय मनसेनं घेतलाय,’ असं राज ठाकरे म्हणाले.
‘मनसेच्या कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीनं गुन्हे दाखल केले जात आहेत. पण आम्हाला काही फरक पडत नाही. शिवसेना विरोधी पक्षात असती तर त्यांनी काय केलं असतं,’ असा सवालही राज ठाकरे यांनी केला.
वाचा:
लॉकडाऊनला विरोध करणाऱ्यांना राज्य सरकार लंडन, अमेरिकेची उदाहरणं देत आहे. त्याचीही राज ठाकरे यांनी खिल्ली उडवली. ‘अमेरिकेत काही होत असेल तर ते बघून घेतील. तुम्ही इकडं लोकांना कशाला घाबरवता?,’ असंही ते म्हणाले. नियम लावायचा आहे तर सगळ्यांना एक नियम लावा. एकासाठी वेगळा, दुसऱ्यासाठी वेगळा असं चालणार नाही. बाहेर पडायला ह्यांना भीती वाटते त्यात आमचा काय दोष?,’ असं राज म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times