मुंबई : मुंबईतील केईएम रुग्णालयात ( Mumbai) एका २१ वर्षीय तरुणाचे यशस्वी () करण्यात आलं आहे. मध्य प्रदेश येथील या तरुणाने एका दुर्घटनेत दोन्ही हात गमावले होते. मात्र आता हात प्रत्यारोपण यशस्वी झाल्याने सदर तरुणाला एक हात पुन्हा मिळाला आहे. राहुल अहिरवार असं या तरुणाचं नाव आहे.

राहुल अहिरवार हा १९ वर्षांचा असताना त्याला हरियाणातील एका कंपनीत नोकरी लागली. मात्र या कंपनीत रुजू झाल्यानंतर १५ दिवसांनी काम करत असताना त्याचे हात मशीनमध्ये अडकले आणि या दुर्घटनेत त्याने दोन्ही हात गमावले. त्यानंतर घरी परतलेल्या राहुलने केईएम रुग्णालयाबाबत ऐकले आणि हात प्रत्यारोपणासाठी तो मुंबईत दाखल झाला.

सप्टेंबर २०२० मध्ये राहुल पहिल्यांदा उपचारासाठी मुंबईत आला. त्यानंतर त्याच्या हात प्रत्यारोपणासाठी हालचाली सुरू झाल्या. काही महिन्यांपूर्वी एका ब्रेन डेड रुग्णाचे नातेवाईक हात डोनेट करण्यासाठी तयार झाले आणि राहुल अहिरवार याच्या हात प्रत्यारोपणाचा मार्ग मोकळा झाला. मात्र दुसऱ्या डोनरच्या हाताबाबत काही समस्या असल्याने राहुलचा एकच हात जोडणं शक्य झालं.

‘मला दोन्ही हात परत मिळाले असते तर खूप चांगलं झालं असतं. मात्र मला उजवा हात पुन्हा मिळाल्याने मी खूश आहे,’ असं राहुलने म्हटलं आहे.

केईएम रुग्णालयातील प्लास्टिक सर्जरी विभागाच्या प्रमुख विनिता पुरी यांनी म्हटलं आहे की, राहुलची शारीरिक स्थिती आता चांगली आहे. आपले हात पुन्हा मिळवण्यासाठी त्याने जी इच्छाशक्ती दाखवली ती खरोखरंच वाखाण्याजोगी होती. असं असलं तरीही राहुलला पुढील उपचारासाठी आणखी वर्षभर तरी मुंबईत राहावं लागणार आहे.

स्पर्धा परीक्षांचं स्वप्न
१२ वी झाल्यानंतरच कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये नोकरीचा मार्ग स्वीकारलेल्या राहुल अहिरवार याला आता पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे. ‘गावी परतल्यानंतर पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे,’ असं त्याने म्हटलं आहे.

दरम्यान, राहुल अहिरवार याच्या हात प्रत्यारोपणासाठी मोठा आर्थिक खर्च आला. त्यामुळे मध्य प्रदेश सरकारने त्याला जवळपास ९ लाख रुपयांची मदत केली. तसंच उपचारादरम्यान विविध ठिकाणांहून निधी मिळवण्यासाठी केईएम रुग्णालयानेही राहुलला साथ दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here