: कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एक लाचखोरीचं प्रकरण समोर आलं आहे. जमिनीच्या वादातील हरकतीच्या सुनावणीत तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महिला मंडल अधिकारी आणि दोन कोतवालांना बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं.
पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये मंडल अधिकारी अर्चना गुळवणी तसंच तात्यासाहेब सावंत आणि युवराज वड या दोन कोतवालांचा समावेश आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात तक्रारदाराची जमीन आहे. या जमिनीबाबत मंडल अधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी ३० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी कोतवाल तात्यासाहेब सावंत यांनी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे धाव घेतली. आज २५ हजाराची लाच घेताना सावंत आणि दुसरा कोतवाल वड यास लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडलं.
ही लाच घेण्यास मंडल अधिकार्यांची संमती होती, हे स्पष्ट झाल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश मोरे यांनी केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times