लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही काँग्रेस आघाडीसोबत जाण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार लोकसभेच्या दोन जागा राष्ट्रवादीने देण्याचे मान्य केले होते. पण, बुलढाण्याची जागा देण्यात अडचण आल्याने त्याबदल्यात विधानपरिषदेची एक जागा देण्याचा शब्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शेट्टी यांना दिला होता. राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर याची संघटनेने आठवण करून दिली. त्यानुसार राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यत्वासाठी शेट्टी यांच्या नावाचा प्रस्ताव पाठविण्यात आला. गेले आठ महिने बारा सदस्यांची ही यादी राज्यपालांच्या कार्यालयात आहे.
वाचा:
दोन दिवसांत घडलेल्या राजकीय घडामोडींनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शेट्टी यांच्यासह व इतर दोन नावे वगळण्याचा आग्रह धरल्याची चर्चा आहे. यातील शेट्टी व खडसे हे भाजपला आव्हान देत महाविकास आघाडीत सहभागी झाले. दोघेही सतत भाजपवर आसूड ओढत असतात. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी त्यांच्या नावावर फुली मारल्यास त्याचा फटका महाविकास आघाडीला बसणार आहे. गेले काही दिवस शेट्टी हे आघाडीवर सतत टीका करत आहेत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे त्यांचे नाव वगळल्यास आघाडीतून बाहेर पडण्यास संघटनेला मोठे कारण मिळणार आहे. तसे झाल्यास आघाडीला मोठा धक्का बसणार आहे. यातून भाजपची खेळी यशस्वी होणार आहे.
संघटना आघाडीतून बाहेर पडल्यास नंतर आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न भाजप करण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना शेट्टी यांची ताकद हवीच आहे. शिवाय आघाडीत राहिल्यास हातकणंगले लोकसभा मतदारसंघ विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना द्यावा लागेल. तसे झाल्यास शेट्टींना महाविकास आघाडीच्या बाजूने मैदानात उतरणे अवघड जाणार आहे. या सर्व राजकीय घडामोडींचा विचार करत गेले काही महिने संघटनेने ‘एकला चलो रे’ ची भूमिका स्वीकारली आहे. लोकसभेचे गणित डोळ्यासमोर ठेवत संघटनेने ही भूमिका स्वीकारली असली तरी पावले मात्र भाजपच्या दिशेने पडत आहेत. आमदारकीला विरोध केलेल्या पक्षासोबत जायचे की नाही याबाबत संघटनेला आगामी काळात निर्णय घ्यावा लागणार आहे.
वाचा:
दरम्यान, या घडामोडीबाबत प्रतिक्रिया देताना शेट्टी म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच लोकसभा निवडणुकीत विधानपरिषदेच्या जागेबाबत शब्द दिला होता. त्यानुसारच त्यांनी आपल्या नावाचा प्रस्ताव राज्यपालाकडे पाठविला आहे. जेव्हा राज्यपाल निर्णय घेतील, तेव्हाच पुढे काय करायचे हे ठरवू. सध्या आमदारकी हा काय जीवन मरणाचा प्रश्न राहिला नाही. त्यामुळे आम्हाला त्यामध्ये रस नाही. पूरग्रस्तांना मदत मिळवून देणे हेच सध्या महत्त्वाचे आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times