२५ टक्के कुटुंबांनी एकदाही सिलिंडर न भरल्याचे उघड

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

वाढत्या महागाईमुळे सामान्य पिचलेले असतानाचा महागणाऱ्या घरगुती सिलिंडरमुळे गरिबांचे कंबरडेच मोडल्याचे दिसून येत आहे. गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी सिलिंडर न भरण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर स्वयंपाकासाठी उपयुक्त लाकडेही महागल्याने त्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत ९६ टक्के परिवारांना घरगुती गॅस सिलिंडरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, सिलिंडरच्या दरात वाढ होत असल्याने पुन्हा स्वयंपाकासाठी ते लाकडाकडे वळत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये लाकडाच्या किमतीत १० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. सप्टेंबरपूर्वी लाकडाचे दर घट असतानाच आता दरांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये पाहिले असता घरगुती गॅसच्या दरात २५ टक्के वाढ झाली आहे. राजधानी नवी दिल्लीमध्ये सध्या विनाअनुदानित सिलिंडर ८५९ रुपयांना मिळत आहे. हाच सिलिंडर ऑगस्ट २०१९मध्ये ५७५ रुपयांना मिळत होता. याचा अर्थ केवश सहा महिन्यांत सिलिंडरच्या दरात २८४ रुपयांची वाढ झाली आहे. सिलिंडरच्या दरात सर्वाधिक वाढ दिल्लीतील विधानसभा निवडणुकीनंतर पाहायला मिळाली आहे. निवडणुकीनंतर सिलिंडरच्या दरात १४५ रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामध्ये निवडणुकीनंतर महिनाभरात घरगुती गॅसच्या दरात ७७ रुपयांची वाढ झाली आहे. ज्याप्रमाणे सिलिंडरच्या दरात वाढ होत आहे, त्याचप्रमाणे जळाऊ लाकडाच्या दरातही वाढ होत असल्याने गरिबांची अवस्था बिकट झाली आहे.

एक चतुर्थांश लाभार्थी गॅसपासून वंचित
डिसेंबर २०१८पर्यंत देशातील ५.९२ कोटी कुटुंबांकडे उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस जोडणी उपलब्ध होती. जून २०१९पर्यंतचे रिफिलचे आकडे पाहिले असता त्यातील २४.६ टक्के कुटुंबांनी दुसऱ्या वेळी सिलिंडर भरले नसल्याचे आढळले आहे. १८ टक्के कुटुंबांनी एकदा किंवा दोनदाच सिलिंडर भरले आहेत. ११.७ टक्के कुटुंबांनी तीनदा सिलिंडर भरले असून, ४६ टक्के कुटुंबांनी चार किंवा त्यापेक्षा अधिक वेळा सिलिंडर भरले आहेत.

सिलिंडर भरण्याची वारंवारिता

एकूण कुटुंबे ५.९२ कोटी

२४.६ टक्के एकदाही सिलिंडर भरला नाही.

१७.९ टक्के एकदा किंवा दोनदाच

११.७ टक्के तीनदा सिलिंडर भरणा

४५.८ टक्के चारपेक्षा अधिक

एकदाही सिलिंडर भरणा नाहीच

छत्तीसगड ५२.३ टक्के

त्रिपुरा ४४.५ टक्के

झारखंड ४३.७ टक्के

आसाम ३६ टक्के

ओडिशा ३५.७ टक्के

मध्य प्रदेश ३२.७ टक्के

सिलिंडर न भरण्याची कारणे काय?

– उज्ज्वला योजनेचा लाभ न घेणारा परिवार वार्षिक ६.७ सिलिंडरचा उपयोग करतो. मात्र, उज्ज्वला योजनेचा लाभ घेणारा परिवार सरासरी ३ सिलिंडरचा उपयोग (२०१८-१९) करतो. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना जरी सिलिंडर उपलब्ध होत असले, तरी वाढीव दराचा खर्च त्यांना पेलवतोच असे नाही.

– उज्ज्वला योजनेंतर्गत जोडणी मोफत असली तरी, गॅस स्टोव्ह आणि रिफिलचा खर्च द्यावाच लागतो.

– दिवसेंदिवस गॅस सिलिंडरची किंमत वाढत असल्याने लाभार्थी त्यातून बाहेर पडत आहेत. या शिवाय अनुदानाची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये उशिरा पोहोचत असल्याचाही फटका बसत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here