पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ईडीच्या चौकशीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी प्रथमच सविस्तर भाष्य केलं. ‘ईडीच्या चौकशीची एवढी प्रकरणं यापूर्वी महाराष्ट्रात कधी ऐकलीत का? असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना केला. एकनाथ खडसे, अनिल देशमुख, अनिल परब, प्रताप सरनाईक यांच्या विरोधात ईडीच्या कारवाया सुरू आहेत. विरोधकांना नमवण्यासाठी एक साधन म्हणून ईडीचा वापर होतोय. ठीक आहे. काळ येतो आणि जातो. काळ जाईल तेव्हा त्यात दुरुस्त्या होतील,’ असं पवार म्हणाले. अनिल देशमुख यांची कायदेशीर लढाई सुरू आहे, असं सांगत, त्या प्रकरणावर त्यांनी अधिक बोलणं टाळलं.
वाचा:
‘आतापर्यंत अनेक गोष्टींची चर्चा आपण ऐकली आहे. मात्र, गेल्या काही वर्षात देशातील लोकांना ईडी नावाची नवीन यंत्रणा माहीत झालीय. ही ईडी कुणाच्या मागे कशी लागेल हे सांगता येत नाही. काल शिवसेनेच्या वाशिमच्या खासदार भावना गवळी आल्या होत्या. त्यांच्या तीन शिक्षण संस्था आहेत. एक इंडस्ट्री आहे. या संस्थांचा व्यवहार २० ते २५ कोटींच्या घरात आहे. त्यांना ईडी त्रास देत आहे, असं पवार यांनी सांगितलं. ‘जिथं कुठं गैरव्यवहार झाला असेल, तिथं तपास करण्यासाठी धर्मादाय आयुक्त असतात. शाळा, कॉलेजचे आर्थिक व्यवहार त्यांच्या अखत्यारीत असतात. राज्य सरकारचं गृहखातं आहे. आपल्याकडे खोलात जाऊन चौकशी करण्याचा अधिकार असलेल्या संस्था असताना प्रत्येक ठिकाणी ईडी येऊन हस्तक्षेप करते, ही राज्याच्या अधिकारावर गदा आहे. अलीकडं सतत ही उदाहरणं ऐकायला मिळत आहेत. हे सगळं योग्य वाटत नाही. संसदेच्या येत्या अधिवेशनात संसदेत आवाज उठवू’, असंही पवार यांनी सांगितलं.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times