कोकणात सोमवार दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेडमध्ये मंगळवारी पावसानं थैमान घातलं होतं. मात्र, आता रत्नागिरी जिल्ह्याच्या अतिवृष्टीचा धोका टळला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाच्या पट्टयाचा प्रभाव रायगड, पालघरच्या दिशेने पुढे गेला आहे, अशी माहिती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कृषी हवामान शास्त्रज्ञ प्रा.डॉ. विजय मोरे यांनी बुधवारी सकाळी दिली आहे.पण बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
सॅटेलाईट इमेजवरून धोक्याचा पावसाचे क्षेत्र पुढे सरकले आहे त्यामुळे तूर्तास तरी धोका कमी झाला आहे. बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव येत्या दिवसात कसा असेल हे लवकरच कळेल, अशी माहिती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे प्रा.डॉ. विजय मोरे यांनी दिली आहे. मात्र, जिल्ह्यात गणेशोत्सव कालावधीतही पाऊस असेल मात्र फार जोर नसेल पण काही ठिकाणी जिल्ह्यात पाऊस जोरदार होऊ शकतो त्यामुळे सावधानता बाळगणे अत्यावश्यक आहे. कमी दाबाचा नवीन पट्टा तयार होत असून त्याची डेव्हलपमेंट कशी असेल याची माहिती आज सायंकाळी किंवा उदयापर्यंत कळू शकेल, अशी माहीती त्यांनी यावेळी दिली आहे.
दरम्यान, आज, बुधवारसाठी पालघर जिल्ह्यात रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, बुधवारी मुंबई आणि ठाण्यातही ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. गुरुवारपासून राज्यात पावसाचा जोर ओसरण्यास सुरुवात होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळं बाप्पाच्या आगमनासाठी भाविकांना कोणतीही अडचण नसणार आहे.
रत्नागिरी जिल्हातील पावसाची आकडेवारी
रत्नागिरी -६१
मंडणगड-२०
दापोली-१५३
चिपळूण-७३
राजापूर-८९
गुहागर-२४०
देवरुख-२८८
खेड-४२
गुहागर- २४०
पाटपन्हाळे – २४०
आबलोली – २२०
तळवली – १६०
हेदवी – १६२
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times