सांगली : कोयना आणि वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दोन्ही धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सोमवारी सकाळी कोयना धरणाची पाणी पातळी २१६२ फूट ११ इंच झाली असून, धरणामध्ये १०४.४९ टीएमसी पाणीसाठ आहे.

यामुळे धरणातून ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर वारणा धरणही क्षमतेनुसार भरले असल्याने यातून ४८०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग वाढवल्याने कृष्णा, कोयना व वारणा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरणसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक अपेक्षित आहे. कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सोमवारी सकाळपासून ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धोम धरणात आजचा पाणीसाठा ९० टक्के असून, ६२२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. कन्हेर धरणाचा आजचा पाणीसाठा ९४ टक्के, तर २४ क्युसेक विसर्ग सुरू आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वारणा धरण क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे या धरणातून चार हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू आहे.

धरण क्षेत्रात असाच पाऊस सुरु राहील्यास धरणामधील पाण्याची आवक आणखी वाढणार आहे. यामुळे येणाऱ्या दोन दिवसात विसर्गात वाढ होऊ शकते. यामुळे नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: वाळावा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील, तसेच महानगपालिका क्षेत्रातील नदी काठावरील व सखल भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी व नदी पात्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here