कारवरील नियंत्रण सुटल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणी ठार झाल्या. हा इतका भीषण होता की ही कार एका घराच्या कम्पाऊंडवॉलमध्ये घुसली. यात अन्य दोन युवक गंभीर जखमी झाले. भावना मोहनलाल यादव (१८, सतरंजीपुरा) आणि राशी दीपक यादव (२२, इतवारी) अशी दोन्ही ठार झालेल्या तरुणींची नावे आहेत. कारचालक चिराग राजेश जैन (२१, सतरंजीपुरा) आणि त्याचा मित्र गिरीश लक्ष्मण रामचंदानी (२१) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. (two young women lost their lives in a in nagpur)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी ११च्या सुमारास अमरावती मार्गावरील भरतनगर परिसरात घडला. मृत तरुणी आणि जखमी तरुण हे मित्र होते. रविवारी रात्री आठच्या सुमारास चौघे चिरागच्या (एमएच ३१ ईवाय ८८९९) क्रमांकाच्या बोलेरो कारने वाडी येथील अॅवटम ऑफ स्फिअर हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर रात्री १०.१० वाजताच्या सुमारास चौघेही घरी येण्यास निघाले. चिराग कार चालवित होता तर त्याच्या बाजूला गिरीश बसला होता. दोन्ही तरुणी मागील सिटवर बसल्या होत्या. चिराग हा वेगात कार चालवित होता. भरतनगर येथील पंजाब नॅशनल बँकेजवळून येत असताना चिरागचा भरधाव कारवरील ताबा सुटला आणि कार फुटपाथवर चढून बाजूला असलेल्या झाडाला धडक दिली. त्यानंतर कार बाजूलाच असलेल्या घराच्या कम्पाऊंड वॉलला धडक देऊन कार उलटली.
क्लिक करा आणि वाचा-
या घटनेची माहिती मिळातच अंबाझरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक बागुल पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. गंभीर अवस्थेत पोलिसांनी दोघींनाही खासगी रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी दोन्ही तरूणींना मृत घोषित केले.
चिराग ताब्यात
अपघातानंतर गिरीश हा घटनास्थळीच जखमी अवस्थेत बसला तर कारचालक चिराग जैन हा पळून गेला. गिरीशने त्याचा मोबाईल क्रमांक पोलिसांना दिला. पोलिसांनी चिरागसोबत संपर्क साधून त्याला घटनास्थळी येण्यास सांगितले. परंतु तो न आल्याने त्याचे लोकेशन घेऊन सेंट्रल एव्हेन्यू चौकातून चिरागला ताब्यात घेतले. त्यावेळी तो मद्यधुंद परिस्थितीत असल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून चिराग यास अटक केली.
क्लिक करा आणि वाचा-
भरतनगर होतेय अपघातस्थळ
या परिसरात काही वर्षांपूर्वी याच प्रकारची एक घटना घडली होती. त्यावेळीसुद्धा कार फुटपाथवर चढून घराच्या कुंपणाला आदळली होती. त्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता तर केवळ एक तरुणी वाचली होती. त्यानंतरसुद्धा या परिसरात अनेकदा अपघात झाले आहेत. अमरावती मार्गावरील चढावाववरून उतरल्यानंतर गाडीचा वेग मुळातच अधिक असतो. अशात अपघाताचा धोकाही अधिक असतो.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times