गणेशवाडी येथील रहिवासी नागनाथ बल्लोरे (४०) आणि त्यांची मुलगी १४ वर्षीय वैष्णवी बल्लोरे या दोघांचे मृतदेह शेतातील विहिरीमध्ये आढळले. दोघेही १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शेताकडे चारा टाकण्यासाठी गेले होते. बऱ्याच वेळानंतर दोघे घरी पोहोचले नसल्याने घरच्या मंडळींनी शेताकडे जाऊन पाहणी केली. त्यात विहिरीजवळ नागनाथ बलोरे यांची चप्पल व मोबाईल आढळून आला. त्यावरून विहिरीत शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विहिरीमध्ये खूप पाणी होते. त्यामुळे पाच मोटारी लावून हे पाणी बाहेर काढावे लागले.
त्यानंतर आज १३ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता या दोघांचे मृतदेह नातेवाईक व ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. शवविच्छेदन करण्यासाठी पालम ग्रामीण रुग्णालयात हे मृतदेह पाठवून देण्यात आले. तत्पूर्वी १२ सप्टेंबर रोजी रात्री पालम पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल भाहतरे आणि फौजदार विनोद साने यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती.
या घटनेची नोंद पालम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times