चेन्नईचा संघ या सामन्यापूर्वी तिसऱ्या स्थानावर होता. पण या सामन्यातील विजयानंतर चेन्नईच्या संघाच्या आठ लढती झाल्या आहेत. आठ सामन्यांमध्ये आता चेन्नईच्या संघाने सहा विजय मिळवले आहेत. त्यामुळे चेन्नईच्या संघाचे आता १२ गुण झाले आहेत. गुणतालिकेत चेन्नई आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांचे आता समान १२ गुण आहेत. पण रनरेटच्या जोरावर चेन्नईच्या संघाने दिल्लीला पिछाडीवर टाकले असून त्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. त्याचबरोबर सर्व संघांमध्ये चेन्नईचा रनरेट हा सर्वात भारी असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे गेल्यावर्षी युएईत पानीत झालेल्या चेन्नईच्या संघाने यावेळी पहिलाच सामना जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला चेन्नई पहिल्या, तर दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा संघ हा तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचा संघ यापूर्वी चौथ्या स्थानावर होता. या पराभवानंतरही मुंबईचा संघ चौथ्याच स्थानावर राहीला आहे. पण मुंबईचा रन रेट कमी झाला आहे, त्यामुळे गोष्टीचा फटका त्यांना बाद फेरीच्या दिशेने जात जाताना बसू शकतो.
आजच्या सामन्यात ऋतुराजच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईच्या संघाने १५६ धावा उभारल्या होत्या. त्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईने यावेळी २० धावांनी मुंबई इंडियन्सवर विजय साकारला. ऋतुराजने यावेळी ९ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ८८ धावांची खेळी साकारली होती. त्यामुळे ऋतुराजची ही खेळी चेन्नईला सामना जिंकवून देणारी ठरली. त्याचबरोबर ड्वेन ब्राव्होचे या विजयातील योगदान विसरून चालणार नाही. कारण ब्राव्होने फलंदाजीमध्ये आठ चेंडूंत तीन षटाकारांच्या जोरावर २३ धावा फटकावल्या होत्या, त्याचबरोबर गोलंदाजी करताना ब्राव्होने यावेळी सर्वाधिक तीन विकेट्स मिळवले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times