गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे कारण एकच गोष्ट ठरली आहे आणि ती म्हणजे मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश. मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीतील सूर्यकुमार यादव, इशान किशन, कृणाल पंड्या, कायरन पोलार्ड हे फलंदाज सातत्याने अपयशी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये या चौघांनाही मोठी खेळी साकारता आलेल्या नाहीत. केकेआरविरुद्धच्या सामन्यात तर रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक यांनी दमदार सलामी दिली होती. पण त्यानंतरही मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले होते. त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या संघाला पराभव पत्करावा लागला होता. सूर्यकुमार यादव हा दोन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे. सूर्यकुमार यादव हा मधल्या फळीचा कणा आहे. कारण सूर्यकुमार जेव्हा चांगली फलंदाजी करतो तेव्हा मुंबई इंडियन्स सामना जिंकते, असे पाहायला मिळाले आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सकडून मधल्याफळीतील सौरव तिवारीने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते. पण या सामन्यात तिवारीला मधल्या फळीतील अन्य खेळाडूंची साथ मिळाली नाही आणि त्यामुळेच मुंबई इंडियन्सला सामना गमवावा लागला होता. कृणाल पंड्या हा सातत्याने अपयशी ठरत असून मुंबई इंडियन्सचे चाहतेही त्याच्यावर नाराज असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आरसीबीविरुद्धच्या सामन्यात जर हार्दिकला संधी देण्याचा विचार झाल तर कृणाल संघाबाहेर जाण्याची सर्वात जास्त संधी आहे. धडाकेबाज फलंदाज इशान किशनलाही अजून लय सापडली नसल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर पोलार्ड फटकेबाजी करत असला तरी त्याला मोठी खेळी साकारता आलेली नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात जास्त धावा जमवल्या तर त्यांना जिंकण्याची सर्वाधिक संधी असेल. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा विजय त्यांच्या मधल्या फळीतील फलंदाजांना अवलंबून असेल, असेच सध्याच्या घडीला दिसते आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times