आपल्या झालेल्या बलात्काराची तक्रार आपण हवाई दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. पण त्यानंतरही अधिकाऱ्यांकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे आपल्याला शेवटी पोलिस ठाण्यात तक्रार करावी लागली, असा आरोप हवाई दलाच्या पीडित महिला अधिकाऱ्याने केला आहे. महिला अधिकाऱ्याने आणखी एक गंभीर आरोप केला आहे. बलात्काराची खात्री करण्यासाठी आपली टू-फिंगर टेस्ट केली गेली. यामुळे आपल्याला मोठा धक्का बसला असून दुसऱ्यांदा बलात्कार झाल्याची भावना निर्माण झाली आहे, असं पीडित महिला अधिकाऱ्याने म्हटलं आहे. विशेष म्हणजे या टू-फिंगर टेस्टवर सुप्रीम कोर्टाने बंदी घातली आहे.
सुप्रीम कोर्टाची टू-फिंगर टेस्टवर बंदी
लिलू राजेश आणि हरयाणा सरकार प्रकरणात (२०१३) सुप्रीम कोर्टाने टू-फिंगर टेस्टला घटनाबाह्य म्हटले होते. या टू-फिंगर टेस्टमुळे बलात्कार पीडितेची गोपनीयता आणि तिच्या सन्मानाला गंभीर ठेच पोहोचते. ही टू-फिंगर टेस्ट शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करणारी आहे, असं सुप्रीम कोर्टाने टू-फिंगर टेस्ट वर बंदी घालत म्हटलं होतं. पण त्यानंतरही टू-फिंगर टेस्ट होत आली आहे. २०१९ मध्ये जवळपास १५०० बलात्कार पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुप्रीम कोर्टात तक्रार केली होती. सुप्रीम कोर्टाचा आदेश असूनही ही टू-फिंगर टेस्ट केली जात आहे. यामुळे ही चाचणी करणाऱ्या डॉक्टरांचा परवाना रद्द करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्रांचीही अशा चाचणीला मान्यता नाही.
शास्त्रीयदृष्ट्या चुकीचं
२०१४ मध्ये केंद्रीय मंत्रालयाने बलात्कार पीडितेसाठी नवी मार्गदर्शक सूचना जारी केली होती. यात सर्व हॉस्पिटल्समध्ये फॉरेन्सिक आणि वैद्यकीय तपासणी कक्ष वेगळा बनवण्याची सूचना केली गेली आहे. यात टू-फिंगर टेस्टला मनाई करण्यात आली आले. पीडितेवर झालेल्या अत्यांचाराची माहिती घेणं आणि पीडितेची शारीरिक तपासणी करण्याबरोबरच त्यांना मानसिकदृष्ट्या समुपदेशन करण्याचा सल्ला देण्यात आला.
कशी केली जाते टू-फिंगर टेस्ट?
पीडितेच्या गुप्तांगात एक किंवा दोन बोटे घालून पीडितेचे कौमार्य तपासले जाते. टेस्टचा हेतू हा त्या पीडित महिलेशी शारीरिक संबंध झाले होते की नाही, हे शोधण्याचा असतो. जर दोन्ही बोटे गुप्तांगात सहजपणे फिरली तर पीडित महिला लैंगिकदृष्ट्या सक्रिय आहे, असे मानले जाते. जर हे घडले नाही आणि बोटांच्या हालचालीमध्ये अडचण आली तर तिच्या गुप्तांगात हायमेन ठीक असल्याचे मानले जाते. म्हणजेच महिला कुमारी असल्याचा हा पुरावा मानला जातो. मात्र, अशा चाचण्या शास्त्रीयदृष्टीने पूर्णपणे नाकारण्यात आल्या आहेत. महिलांच्या कौमार्यात हायमेनचा भाग कायमह राहणं हे एक मिथक मानलं जातं.
बलात्कारांच्या प्रकरणांमध्ये वैद्यकीच पुरावे हे निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी भूमिका बजावतात. दोन व्यक्तींमध्ये सहमतीने शारीरिक संबंध होऊ शकतात. यामुळे बलात्काराच्या प्रकरणांमध्ये फरेन्सिक पुराव्यांवरही अवलंबून राहता येत नाही. केवळ अल्पवयीन मुलांच्या बाबतीत, याकडे ठोस पुरावा म्हणून पाहिले जाते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times