पुणे: ज्येष्ठ साहित्यिक, कथाकथनकार, विनोदी लेखक, पटकथाकार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष द. मा. मिरासदार (DM Mirasdar) यांचे पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. मिरासदार हे साहित्य वर्तुळात ‘दमा’ आणि ‘दादासाहेब’ या नावाने प्रसिद्ध होते. (senior literary d m mirasdar dies of old age in pune)

‘बापाची पेंड’ या सन १९५७ साली प्रकाशित आलेल्या त्यांच्या पहिल्याच कथासंग्रहाने त्यांना ग्रामीण कथाकार अशी मान्यता मिळवून दिली. या पहिल्या कथासंग्रहानंतर त्यांचे हुबेहूब, विरंगुळा, स्पर्श, मिरासदारी आणि अलिकडेच प्रकाशित झालेला भोकरवाडीच्या गोष्टी हे कथासंग्रह लोकप्रिय ठरले. मिरासदार यांनी आपल्या लेखनातून ग्रामीण जीवनाचे चित्रण केले आहे. त्यांनी आपल्या लेखनातून ग्रामीण जीवनातील विसंगती, विक्षिप्तपणा आणि इरसालपणाच्या आधाराने आपला विनोद फुलवला.

क्लिक करा आणि वाचा-
मिरासदार यांनी ललितलेखनही केले आहे. ‘सरमिसळ’, ‘गप्पांगण’ हे त्यांचे ललित लेखसंग्रह देखील गाजले. ललित लेखनासोबतच मिरासदार यांनी एकांकिकाही लिहिल्या. त्यांच्या एकांकिका सुट्टी व पाच एकांकिका या नावाने प्रसिद्ध आहेत.

मराठी साहित्यविश्वात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांनी विनोदी लेखनाची परंपरा जोपासली. हीच परंपरा द. मा. मिरासदारानी पुढे सुरू ठेवली. मिरासदारांच्या ‘व्यंकूची शिकवणी’, ‘माझ्या बापाची पेंड’, ‘शिवाजीचे हस्ताक्षर’, ‘भुताचा जन्म’, ‘माझी पहिली चोरी’, ‘हरवल्याचा शोध’ इत्यादी कथा वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या घर करून राहिल्या आहेत. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत.

क्लिक करा आणि वाचा- पटकथाकार दमा

द. मा. मिरासदार यांच्या नावावर तब्बल १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा आहेत. ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटात कथा-पटकथा लेखना करतानाच त्यांनी हेडमास्तरची भूमिकाही साकारली होती.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here