हायलाइट्स:
- ‘शेतकरी आंदोलना दरम्यान भाजपकडून हिंसा भडकावण्याचा प्रयत्न’
- भाजप नेत्यांनी यूपीच्या ग्रामीण भागांचा दौरा टाळावा, टिकैत यांचा इशारा
- सिसौलीमध्ये नरेश टिकैत यांचं वक्तव्य
भारतीय किसान युनियनच्या मुख्यालयात एका शेतकरी सभेला संबोधित करताना टिकैत यांनी भाजपला इशारा दिलाय. लखीमपूर खीरी भागात घडलेल्या घटनेनंतर रविवारी रात्री उशिरा सिसौलीमध्ये नरेश टिकैत यांच्या निवासस्थानी आपात्कालीन बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी, त्यांनी भाजपवर हिंसा भडकावत शेतकरी आंदोलनाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केलाय.
भाजप नेत्यांना इशारा
शेतकरी चिडलेले आहेत. भाजप सरकारविरुद्ध शेतकऱ्यांचा क्रोध अनावर झालेला आहे. त्यामुळे कुठेही कोणत्याही प्रकारची घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अप्रिय घटना टाळण्यासाठी भाजप नेत्यांनी राज्यातील ग्रामीण क्षेत्राचा दौरा टाळावा, असं टिकैत यांनी रविवारी लखीमपूर खीरी जिल्ह्यात झालेल्या हिंसक घटनेनंतर म्हटलंय.
भाजप सरकारवर टीका
लखीमपूर घटनेतून सरकारनं आपला अमानवीय चेहरा समोर आल्याचीही त्यांनी टीका केली. शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडता आलं नाही त्यामुळे सरकार आता शेतकऱ्यांनाच गाडीखाली चिरडू लागलंय, अशी टिप्पणी टिकैत यांनी केली.
शेतकऱ्यांना आवाहन
सोबतच, शेतकऱ्यांनी रस्ते बंद करून नयेत, तसंच करून कोणत्याही किंमतीत आंदोलन हिंसक होणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन नरेश टिकैत यांनी आंदोलकांना केलंय.
रविवारी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या लखीमपूर दौऱ्यादरम्यान हिंसाचाराची घटना घडली. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यात चार शेतकऱ्यांसहीत भाजपचे तीन कार्यकर्ते आणि एका ड्रायव्हरचाही समावेश आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times