हायलाइट्स:
- आशिष मिश्रा केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा
- कथितरित्या गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या मृतदेहाचं दुसऱ्यांदा शवविच्छेदन
- आशिष मिश्रा यानं गाडीतूनच गर्दीवर गोळी झाडली, शेतकऱ्यांचा आरोप
- पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये काय म्हटलंय?
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यानं लखीमपूर खीरीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सभेत दाखल होत तिथं फायरिंग केली. यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला, असा उल्लेखही या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.
हत्या आणि बेजबाबदारपणाचा ठपका ठेवलेल्या आरोपी आशिष मिश्रा याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. यावर, शेतकऱ्यांशी चर्चा, शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कार यांसहीत अनेक मुद्यांत व्यग्र झाल्यानं आरोपीच्या अटकेत उशीर झाल्याचं पोलिसांनी म्हटलंय.
केंद्रीय मंत्री आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासमोर विरोध प्रदर्शन करण्यासाठी रविवारी शेतकरी आंदोलक काळे झेंडे हातात घेऊन आपला शांतीपूर्ण पद्धतीनं विरोध व्यक्त करत होते.
एफआयआरमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे, घटना दुपारी ३.०० वाजल्याच्या सुमारास घडली. आशिष मिश्रा आपल्या तीन वाहनांसोबत १५-२० पुरुषांनासोबत घेऊन हत्यारांसहीत बनवारीपूर सभास्थळाकडे रवाना झाले. आशिष आपल्या महिंद्रा थार गाडीमध्ये डाव्या बाजुला बसले होते. गाडीतूनच त्यांनी गर्दीवर गोळी झाडली. त्याच दरम्यान त्यांच्या वाहनानं गर्दीला धडक दिली. गोळीबारात शेतकरी सुखविंदर सिंह यांचा २२ वर्षीय मुलगा गुरविंदर याचा मृत्यू झाला.

लखीमपूर हिंसा केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या मुलाचा सुनियोजित कट, FIR मध्ये उल्लेख
मंत्र्याच्या मुलाच्या गाडीनं रस्त्याच्या दोन्ही बाजुला असलेल्या शेतकऱ्यांनाही धडक दिली. त्यामुळे वाहनचालकाचा वाहनावरचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्यावरून खाली आडवी पडली. यामुळे अनेक जण जखमी झाले. यानंतर मंत्र्याचा मुलगा गाडीतून उतरला आणि आपल्या बंदुकीतून गोळीबार करत उसाच्या शेतातून पळून गेला, असाही उल्लेख या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.
या कथित हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे चिडलेल्या शेतकऱ्यांनी हिंसाचार आणि जाळपोळ केली. या हिंसेत आणखी तीन जणांना आपले जीव गमवावे लागले.
शवविच्छेदन अहवालाचा घोळ
सुरुवातीला जाहीर करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात आठ जणांच्या मृत्यूचं कारण जखमा, तीव्र धक्का आणि ब्रेन हॅमरेज असल्याचं सांगण्यात आलं होतं. कथितरित्या बंदुकीच्या गोळीला बळी पडलेल्या शेतकऱ्याच्या मृतदेहाचं दुसऱ्यांदा शवविच्छेदन लखनऊच्या डॉक्टरांद्वारे करण्यात आलंय.
केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या मुलानं मात्र आपण घटनास्थळी असल्याचा शेतकऱ्यांचा दावा फेटाळून लावलाय. आपल्या मुलाविरुद्ध पुरावा दिला तर लगेच राजीनामा देईन, अशी घोषणाही केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी केलीय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times