हायलाइट्स:
- उत्तर प्रदेशातील दोन वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयासमोर याचिका दाखल
- ज्या पद्धतीनं लोकांचा जीव गेला ती घटना दुर्दैवी : सर्वोच्च न्यायालय
- उद्या, ८ ऑक्टोबर रोजी होणार पुढील सुनावणी
सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज (गुरुवारी) या प्रकरणाची सुनावणी पार पडली. शुक्रवारी उत्तर प्रदेश सरकारनं या प्रकरणात विस्तृत अहवाल सादर करावा, असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.
या अहवालात मृतांची माहिती, एफआयआर, आरोपी कोण आहेत? कुणाकुणाला अटक करण्यात आली? चौकशी आयोग इत्यादीबाबत विस्तृतपणे माहिती सर्वोच्च न्यायालयानं सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
ज्या पद्धतीनं लोकांचा जीव गेला ती घटना दुर्दैवी आहे. आरोपी कोण आहे? एफआयआरमध्ये कुणाच्या नावाचा उल्लेख आहे? कुणाला अटक करण्यात आलीय. सगळी माहिती द्या. आतापर्यंत चौकशीत काय समोर आलं. आतापर्यंत अलाहाबाद उच्च न्यायालयात काय घडलं? याचाही स्टेटस रिपोर्ट सादर करा
सर्वोच्च न्यायालय
या हिंसाचार मृत्युमुखी पडलेला शेतकरी लव्हप्रीत सिंग याच्या आईच्या उपचारासाठी हरएक संभाव्य मदत पुरविली जावी, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयानं योगी सरकारला दिले आहेत. आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर लवप्रीत सिंहच्या आईला जोरदार धक्का बसला होता. तेव्हापासून त्या आजारी आहेत.
उत्तर प्रदेश सरकारची युक्तीवाद मांडणाऱ्या गरिमा प्रसाद यांनी, सरकारनं एफआयआर दाखल केल्याचं न्यायालयासमोर सांगितलं. शिवाय या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली गठीत करण्यात आलेली चौकशी समिती नेमण्यात आल्याचंही त्यांनी कोर्टासमोर म्हटलं.
यावर, उच्च न्यायालयात या प्रकरणासंदर्भात किती याचिका दाखल झाल्या? त्यांचा तपशील आणि स्टेटस रिपोर्ट दाखल करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.
लखीमपूर हत्याकांडात एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये चार शेतकरी आणि एका पत्रकाराचाही यात समावेश आहे. केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष टेनी यानं शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात येत आहे. मात्र, अद्याप आशिष मिश्रा याला अटक करण्यात आलेली नाही. या हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशातील दोन वकिलांनी सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांना पत्र लिहून सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times