हायलाइट्स:
- भगर खाल्ल्यानंतर सहा जणांना विषबाधा
- अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात घडली घटना
- एका रुग्णाची प्रकृती गंभीर
अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे भगरीतून एकाच कुटुंबातील सात वर्षाच्या मुलीसह ६ जणांना विषबाधा झाल्याने या सर्व नागरिकांवर वडीगोद्री येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
नवरात्र महोत्सव सुरू झाल्याने नऊ दिवस उपवास धरण्याची परंपरा आहे. गुरूवारी पहिल्या माळेचा उपवास होता. अंतरवाली सराटी येथील कांताबाई एकनाथ तारख (वय ५५ वर्षे), महादेव एकनाथ तारख (वय ३४ वर्षे), जगन्नाथ एकनाथ तारख (वय २७ वर्षे), ज्योती महादेव तारख (वय ३० वर्षे), सीमा जगान्नाथ तारख (वय २२ वर्षे), ज्ञानेश्वरी जगन्नाथ तारख (वय ७ वर्षे) हे सगळे सकाळी ११ वाजता भगर खाऊन शेतात काम करायला गेले.
दुपारी २.३० वाजेच्या दरम्यान शेतात त्यांना मळमळ, उलटी, थरकाप तसंच थंडी वाजून येऊन त्रास होऊ लागला. शेजारी असलेल्या शेतकरी योगेश तारख यांनी ज्ञानेश्वरी व कांताबाई तारख सोडता चौघांना गाडी बैलातून औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गपर्यंत आणून नंतर वाहनांनी त्यांना वडीगोद्री येथील साई हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
ज्योती तारख यांची प्रकृती खालावल्याने त्यांना औरंगाबाद येथे उपचासाराठी हलवण्यात आलं आहेत. तसंच इतर सदस्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉ.राजेंद्र तारख यांनी सांगितलं आहे.
विषबाधा झालेल्यांमध्ये तीन महिला, दोन पुरुष, एका मुलीचा समावेश आहे. यातील एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times