हायलाइट्स:
- ‘आशिष मिश्राच्या अटकेपर्यंत उपोषण सुरूच राहणार’
- शुक्रवारी सायंकाळपासून नवज्योत सिंह सिद्धू उपोषणावर
- हिंसाचारातील पीडित कुटुंबाच्या घरासमोरच आंदोलन
शुक्रवारी नवज्योत सिंह सिद्धू यांनी लखीमपूरमध्ये हिंसाचाराचे बळी ठरलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी सिद्धू यांनी हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या लवप्रीत सिंह आणि पत्रकार रमन कश्यप यांच्या कुटुंबाची भेट घेतली.
या भेटीनंतर सिद्धू यांनी रमन कश्यप याच्या घरासमोरच उभारण्यात आलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये मौन व्रत धारण करत धरणं आंदोलन सुरू केलं. आशिष मिश्रा याला अटक केली जात नाही तोवर आंदोलन सुरूच राहील, अशी घोषणा यावेळी सिद्धू यांनी केली.
आयपीएस अधिकारी सुनील कुमार सिंह, गोला एसडीएम अखिलेश यादव आणि निघासन एसडीएम ओमप्रकाश गुप्ता यांनी सिद्धू यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला परंतु, ‘गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा राजीनामा आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ मोनू याच्या अटकेपर्यंत आपलं उपोषण सुरूच राहील’ असं एका कागदावर लिहून सिद्धू यांनी अधिकाऱ्यांना कळवलं होतं. मात्र, आता सिद्धू यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय.
दुसरीकेडे, ‘आम्हाला माहीत आहे की तो निर्दोष आहे. घटना घडली तेव्हा आशिष घटनास्थळी नव्हता. त्याला केवळ चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. दुसरा एखादा पक्ष सत्तेत असता तर एफआयआर दाखलही झाली नसती’, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी दिलीय.
हत्येचा आरोप असूनही दोन नोटिशीनंतर मंत्रीपुत्र आशिष मिश्रा घटनेनंतर तब्बल सहा दिवसांनी पहिल्यांदाच पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झाला आहे. शुक्रवारी तब्येतीचं कारण देत आशिष मिश्राकडून चौकशीसाठी उपस्थितीत राहण्यासाठी वेळ वाढवून मागण्यात आली होती. आशिष मिश्रा याच्यावर चार शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्याचा आरोप आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आशिष मिश्रावर कलम ३०२ अंतर्गत हत्येच्या गुन्ह्याची नोंद आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times