वाराणसी: यूपी काँग्रेसने २०२२ च्या विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून औपचारिकरित्या आपला निवडणूक प्रचार सुरू केला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींनी ( प्रियंका गांधी वद्रा ) आधी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर आणि दुर्गा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर त्यांनी एका सभेला संबोधित केले. सभेला आधी ‘प्रतिज्ञा रॅली’ असे नाव दिले गेले होते. आता ते नाव बदलून त्याचे ‘किसान न्याय रॅली’ असे नामकरण करण्यात आले आहे. प्रियांका गांधींनी सभेत आपल्या भाषणाची सुरवात दुर्गा मातेच्या श्लोकाने केली. यानंतर त्यांनी राज्यातील भाजपच्या योगी सरकारवर निशाणा साधला. भाजप सरकारमध्ये जनतेला न्यायाची आशा उरली नाही, अशी टीका प्रियांकांनी केली.
इथे न्याय मागणाऱ्यांना दडपलं जातं. मग ते हाथरस, उन्नाव किंवा आता लखीमपूर खिरी का असेना. भाजप सरकार न्याय देण्यात अपयशी ठरले आहे. पंतप्रधान मोदी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहेत. पण हे स्वातंत्र्य कोणी दिले? शेतकऱ्यांनी हे स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. आणि पंतप्रधान मोदी त्यांनाच भेटायला जात नाहीत, असं त्या म्हणाल्या. ‘दलिताची हत्या, राहुल – प्रियांका हनुमानगढला कधी जाणार?’ मायावती बरसल्या
वाराणसीतील ‘किसान न्याय रॅली’मध्ये काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. देशाच्या गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने ६ शेतकऱ्यांना त्यांची निर्घृणपणे कारखाली चिरडून हत्या केली. आम्हाला न्याय हवाय, नुकसान भरपाई नको, असं आता सर्व पीडित कुटुंब म्हणत आहेत. पण आपल्याला न्याय देणारा या सरकारमध्ये दिसत नाहीए. ज्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडलेल्या त्या गृह राज्यमंत्र्याचा बचाव राज्याचे मुख्यमंत्री करत आहेत. पंतप्रधान लखनऊला येऊ शकतात. मग ते शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी दोन तासांच्या अंतरावर असलेल्या लखीमपूरला का गेले नाहीत?, असा सावल प्रियांका गांधींनी उपस्थित केला.