हायलाइट्स:
- शेतकऱ्यांच्या हत्याकांडानंतर देशभरात संताप
- महाविकास आघाडीकडून ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक
- भाजपने केला पलटवार
‘ज्या घटनेचा महाराष्ट्राशी अर्थअर्थी संबंध नाही, ज्या घटनेतील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे, त्या घटनेबाबत पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी, त्यांच्या सरकारच्या काळात झालेले गोवारी हत्याकांड आणि मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार याबाबत बंद पुकारला होता का,’ असा सवाल कोल्हापूर भाजप पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
‘१९९४ साली आपल्या न्याय्य मागण्यांसाठी, स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणाऱ्या शरद पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत आदिवासी गोवारी समाजाच्या नागरिकांनी नागपूर विधानसभेवर मोर्चा काढला होता. ५ हजारहून अधिक गोवारी बांधव या मोर्चात सहभागी होते. हा मोर्चा पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारात ११४ निरपराध लोकांना जीव गमवावा लागला. त्यात मोठ्या संख्येने लहान मुले व महिला होत्या. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले शरद पवार यावर का गप्प बसले? त्याच पद्धतीने २०१२ मे मध्ये मावळ तालुक्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर झालेल्या पोलीस गोळीबारात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांचा पाठलाग करून त्यांना गोळ्या घातल्या गेल्या. या मागे तत्कालीन मंत्री अजित पवारांचा हात असल्याचे उघड बोलले जात होते. तेव्हा या आघाडीला शेतकऱ्यांवर झालेले अन्याय दिसले नाहीत का?’ असा खरमरीत सवाल भाजपकडून उपस्थित करण्यात आला आहे.
दरम्यान, व्यापारी व व्यवसायिक बांधवांनी दबाव झुगारून आपले व्यवसाय सुरू ठेवावेत, असं आवाहनही भाजपाच्या वतीने करण्यात आलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times